मुंबई, 2 मार्च : कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळाला आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा पराभव केला, पण भाजपच्या या विजयात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे गेमचेंजर ठरले. राहुल कलाटे यांनी चिंचवडमध्ये 44 हजारांपेक्षा जास्तचं मताधिक्य घेतलं.
राहुल कलाटेंमुळे चिंचवडमध्ये भाजपचा विजय झाल्याचं अजित पवारांसह महाविकासआघाडीचे नेते म्हणाले. महाविकासआघाडीच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल कलाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.
काय म्हणाले फडणवीस?
'चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा 36 हजार मतांनी विजय झाला. चिंचवडच्या जनतेने लक्ष्मण जगताप यांना या विजयातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. राहुल कलाटे उभे राहिल्यामुळे भाजपचा विजय झाला, असा भ्रम काही जण पसरवत आहेत, पण हे सत्य नाही. 2019 ला पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला. राहुल कलाटेंना सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन स्वतंत्र उमेदवार म्हणून उभं केलं, पण ते 38 हजारांच्या फरकाने हरले. त्यावेळी हा प्रयोग का झाला होता? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांना उभं केलं तर जी शिवसेनेची हिंदुत्ववादी मतं आहेत ही सरळ भाजपकडे जातील, म्हणून त्यांना अपक्ष उभं केलं होतं', असं फडणवीस म्हणाले.
'यावेळीही राहुल कलाटे उभे राहिले, त्यामागेही हेच डिझाईन होतं. ते जर उभे राहिले नाहीत तर हिंदुत्ववादी मतं शिवसेनेकडे जातात ती सगळी मतं भाजपकडे जातील, म्हणून त्यांना उभं करण्यात आलं आणि त्यांनी मतं घेतली. ती सगळी मतं महाविकासआघाडीला गेली नसती. ते उभे राहिले नसते तर 60-65 टक्के मतं भाजपला मिळाली असती. ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्ट्रॅटजी होती, त्यातूनच त्यांनी कलाटेंना उभं केलं', असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, BJP, Devendra Fadnavis, NCP, Pune