पुणे, 23 डिसेंबर : कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
लोकशासन संवादतर्फे ही सांस्कृतिक परिषद घेण्यात येणार होती. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी या परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता आयोजक काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.
एल्गार परिषद...कोरेगाव भीमा आणि वाद
1 जानेवारी 2018 मध्ये भीमा कोरेगाव परिसरात शौर्यदिन साजरा केला जात असतानाच जवळच असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला होता. सणसवाडीत हा वाद शिगेला पोहचला होता. तिथे अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला होता.
भीमा कोरेगावच्या घटनेने महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं वातावरण ढवळून निघालं. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाकंटकांनी केला. राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि प्रत्येकजणाने आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. या राजकीय साठमारीत समाजाची विण उसवली गेली.
दरम्यान, याच हिंसाचार प्रकरणात हात असल्याच्या आरोपाखाली तेव्हा घेण्यात आलेल्या एल्गार परिषदेतील अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.