पुणे, 23 मे : सोमवारी जयंत पाटील हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले होते. तब्बल साडेनऊ तास त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आणि चौकशीला हजर होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांना फोन करून त्यांची चौकशी केली. तसेच राज्यभरात ईडीच्या या कारवाईविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मात्र दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांना फोन न केल्यानं चर्चेला उधाण आलं होतं. अखेर जयंत पाटील यांना फोन का केला नाही याबाबत आता खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
जयंत पाटील यांना फोन केला नाही याचा विपर्यास करण्यात आला. यापूर्वीही अनेक राष्ट्रवादींच्या नेत्यांची चौकशी झाली, पण मी तेव्हाही कोणाला फोन केला नाही. मी कुठल्याच नेत्याच्या चौकशीवेळी काही बोललो नाही. काही स्टेटमेंट दिलं नाही. माझ्या कामाच्या 22 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे मी कोणत्याही नेत्यांच्या कारवाईबद्दल प्रतिक्रिया देत नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. बेरोजगारी, महागाई यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता 9 वर्ष झाली, एकच वर्ष राहिलं. कर्नाटकचा निकाल लागला आहे. त्यामुळे मनात शंका आली असेल असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. तसेच मविआत कोणतेही मतभेद नसून, महाविकास आघाडीत वरिष्ठांचे निर्णय मानले जातात असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, ED, Jayant Patil, NCP