

नाशिकच्या कळवन मालेगाव रोडवर झालेल्या अपघातात मृतांची संख्या 26 वर गेली आहे. मालेगावहून कळवनकडे जाणारी कळवण आगाराची ही बस होती. बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तितक्या बससमोर आलेल्या रिक्षावर धडक बसली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडली.


यात ऍपे रिक्षातील 9 आणि बसमधील 48 प्रवासी अडकले होते. तर आतापर्यंत 26 प्रवाशांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघाताचे अनेक फोटो आता समोर आले आहे.


या भीषण अपघातामध्ये मृत प्रवाशांची संख्या 26 गेली असून अद्याप काही जण अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अद्यापही घटनास्तळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.


प्रवाशांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर 5 क्रेनच्या मदतीने विहिरीतून बस बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं.


या अपघात अत्यंत दुर्दैवी असून या अपघाताची माहिती महामंडळ स्तरावर घेण्यात येत आहे. जे प्रवासी व कर्मचारी या अपघातात मृत झाले त्यांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे दहा लाखांची मदत केली जाणार आहे.


जे प्रवासी जखमी आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री, संसदीय कार्य तथा अध्यक्ष एसटी महामंडळ डॉ. अनिल परब यांनी दिली आहे.


मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बसच्या झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.


जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांना आवश्यक तो सर्व औषधोपचार देण्याचेही त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे.


बचावकार्य अधिक वेगाने व्हावे यासाठी एनडीआरएफच्या जवानांची मदतही घ्यावी तसेच मृत व जखमींच्या नातेवाईकांना सर्व आवश्यक सहाय्य करावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.


जखमींवर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व 9 डॉक्टर जातीने लक्ष ठेवून आहेत. अपघात झाल्याचे कळताच पाच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. तर अद्यापही घटनास्थळी बचावरकार्य सुरू आहे.


या अपघातात दोन सख्खा भावांचा मृत्यू झाला असून दोघांच्या पत्नी बचावल्या असल्याची बातमी समोर येत आहे. चुलत भावजयीच्या अंत्यविधीवरुन परत येताना निकम बंधूंवर काळाने घाला घातला आहे. बाळासाहेब चिंधा निकम आणि त्यांचे धाकटे बंधू शांताराम चिंधा निकम हे सलून व्यावसायिक आहेत. या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. अंत्यविधी आटोपल्यानंतर निकम कुटुंब कळवणला यायला निघालं होतं. त्यावेळी बसच्या अपघातामध्ये दोन भावांचा जीव गेला पण दोन्ही भावजया बचावल्या आहेत.


या अपघातात मालेगाव येथील अन्सारी कुटुंबातील 8 जण मयत झाले आहे. हे कुटुंब आपल्या परिवारातील मुलासाठी मुलगी बघण्याच्या अर्थात लग्न जमवण्यासाठी देवळा इथे आले होते. तो कार्यक्रम आटपून परततत असताना त्यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. संपूर्ण कुटुंबाच्या अशा जाण्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर वैवाहिक जीवन सुरू होण्याआधीच तरुणाचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.