

भाजपला बहुमत मिळणार की नाही? यावर सध्या राजकीय पंडित देखील आता अंदाज वर्तवताना दिसत आहेत. शिवाय, काँग्रेस देखील जास्त जागा जिंकू शकते असा देखील एक मत प्रवाह दिसून येत आहे. पण, भाजप आणि काँग्रेसला बहुमत न मिळाल्यास त्यांना इतर पक्षांची देखील मदत घ्यावी लागेल.


जननमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार हे पाहावं लागणार आहे. काँग्रेसपासून फारकत घेत वायएसआर रेड्डी यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. आंध्र प्रदेशात YSR काँग्रेस 13 ते 20 जागा जिंकेल असा अंदाज आहे. पण, पाठिंबा कुणाला देणार याबद्दल अद्याप काहीही स्पष्टता नाही.


ओडिसामध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या BJDचे प्रमुख आणि ओडिसाचे मुख्यमंत्री बिजू पटनायक जागा कमी पडल्यास कुणाला पाठिंबा देतील हे पाहावं लागणार आहे. बीजेडीकडे किमान 10 ते 15 खासदार असतील असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी BJDनं काँग्रेस आणि भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी कुणाला पाठिंबा देणार याबाबत काहीही निर्णय जाहीर केलेला नाही. पण, सद्य स्थितीत पटनायक नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील असा अंदाज आहे.


TRS देखील सत्ता स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. चंद्रशेखर राव यांच्या TRSची तेलंगनामध्ये पकड मजबूत आहे. तेलंगना राष्ट्र समिती 12 ते 15 जागा जिंकेल असा अंदाज आहे.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींविरोधात सतत टीका केली आहे. यापूर्वी तृणमुल काँग्रेसनं केंद्रात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना पाठिंबा दिला आहे. तृणमुल काँग्रेस 20 ते 25 जागा जिंकेल असा अंदाज आहे. पण, यावेळी वेळ पडल्यास पाठिंब कुणाला देणार हे पाहावं लागणार आहे.