

एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी रविवारी मोठी घोषणा केली.


जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचं लक्ष्य असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र ही लस 5 पैकी केवळ एका व्यक्तीला मिळणार आहे.


जवळपास 20-25 कोटी लोकांपर्यंत जुलै 2021 पर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.


आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, 2021 जुलैपर्यंत उपलब्ध होणार असून सुरुवातीला ही लस डॉक्टर, नर्स, पॅरामेडिक्स सारख्या आरोग्य विभागारीत कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी सरकारनं राज्यांकडून यादी मागवली आहे.


सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची लस, भारत बायोटेक आणि जॉन्सन अॅण्ड जॉनन्स या तीन कंपन्यांकडून जगाला खूप अपेक्षा आहेत.


ICMR-भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या Covaxin या लशीची सध्या दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे. झायडस कॅडिलाचा ZyCov-D या लशीची सध्या मानवी चाचणी सुरू असून त्याचं परीक्षण नोंदवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका आणि सीरमने तयार केलेली Covishield या लशीची सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.