सांगली/जळगाव,ता.1,ऑगस्ट : सांगली आणि जळगाव महापालीकेसाठीचं मतदान बुधवारी सायंकाळी संपलं. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडलं. मतदान अंदाजे 55 टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता असून निवडणूक आयोगाने अद्याप मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5,30 पर्यंत मतदान चालललं दोनही ठिकाणी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. साडेपाचपर्यंत रांगेत असलेल्या सर्व नागरिकांना मतदाना करू देण्यात आलं. दोनही ठिकाणांची मतमोजनी 3 ऑगस्टला होणार आहे. सांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील तर जळगावात सुरेशदादा जैन या दोन दादांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सांगली
सांगलीत मतदान शांततेत पार पडलं. 78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं हे गाव असल्याने पाटील गेल्या दोन महिन्यांपासून सांगलीत तळ ठोकून आहेत. त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. तर भाजपच्या वतीनं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आघाडी सांभाळली. तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत असून खासदार गजानन किर्तिकर यांनी शिवसेनेचा गढ सांभाळला. राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटलेलं असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना सांगलीत प्रचाराला जाता आलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड खेचून आणण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली आहे. तर वर्चस्व कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसलीय.
जळगाव
जळगावमध्ये मतदान शांततेत पार पडलं. राज्यात कुणाचीही सत्ता असली तरी जळगाव महापालिकेत वर्चस्व असतं ते सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीचं. साडेचार वर्ष तुरूंगात राहिल्यानंतर दादांना जामीन मिळालाय. त्यामुळे खान्देश विकास आघाडी फॉर्ममध्ये आहे. तर मुख्यमंत्र्यांचे विश्वासू गिरीष महाजन यांनी भाजपकडून खिंड लढवली. नाराज असल्याने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मनातून साथ देतील याची त्यांना खात्री नाही. त्यामुळं महाजन स्वत: प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून ती गोष्ट करून घेत होते. तर शिवसेना भाजपला धक्का देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहे. तीन ऑगस्टला निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा