बिहार, 04 नोव्हेंबर : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव याने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. घटस्फोटानंतर तेजप्रताप यादव यांनी पत्नी ऐश्वर्या राय हिच्यावर गंभीर आरोप केले आहे. न्यूज१८ नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्यावर राजकीय स्वार्थासाठी लग्न करण्याचा आरोप केला आहे. पटना सिव्हिल कोर्टात दाखल करण्यात आलेल्या अर्जात तेजप्रताप यांनी ऐश्वर्या ही आपला भाऊ तेजस्वी यादवविरुद्ध लढवणार होती आणि दोघांमध्ये फूट पाडणार होती असा आरोप केला.
तेजप्रताप यांनी आपल्या घटस्फोटाच्या अर्जात लग्न झाल्यानंतर ते १ सप्टेंबरपर्यंत दोघांमध्ये काय घडलं याचा उल्लेख केलाय. "२ जून रोजी ऐश्वर्याने म्हटलं होतं की, तुमच्या घरातील सर्व जण अडाणी लोकं आहे. ९ जून आणि ११ जूनदरम्यान दोघांमध्ये भांडण झालं. दोघांनी एकमेकांवर पाणी फेकले होते आणि मारहाणही झाली होती. त्यानंतर जुलै आणि आॅगस्ट महिन्यात दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले होते."
ऐश्वर्याने आपल्याला वडिलांकडून छपरा लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी दबाव टाकत होती असा आरोपही तेजप्रताप यांनी केला आहे. तसंच ऐश्वर्याला कोणत्याही मुद्द्यात कुटुंबातील इतर सदस्यांचा हस्तक्षेप नको होता. तिने कायदेशीर अडचणीत अडकवण्याची धमकीही दिली होती.
तेजप्रताप यादव यांनी लग्नाच्या पाच महिन्यानंतर पत्नी ऐश्वर्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी कौटुंबिक न्यायालयात अर्जही केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे. तेजप्रताप यांचं लग्न बिहारचे माजी मुख्यमंत्री दारोगा प्रसाद राय यांची नात आणि माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय हिच्यासोबत १२ मे रोजी झालं होतं.
===================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aishwarya rai, Divorce petition, Patna, Tej pratap yadav