चंदीगड, 19 मे : लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आलेला असताना आता पंजाबमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांमधील वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू या दोघांनी परस्परांना आता लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेसची प्रतिमा बिघडवत असून त्यांना आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पडत असल्याचं मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. पक्षानं त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केली आहे. जर ते खरंच काँग्रेसचे असते तर त्यांनी तक्रारीसाठी निवडणुकीचा काळ निवडला नसता असं देखील यावेळी अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. पटियालामध्ये मतदानाचा हक्का बजावल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग पत्रकारांशी बोलत होते.
आणखी काय म्हणाले अमरिंदर सिंग
दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर काय कारवाई करावी हे सर्व पक्षावर अवलंबून असल्याचं यावेळी सिंग यांनी म्हटलं आहे. सिद्धू हे महत्त्वकांक्षी आहेत. त्यांना मी लहान असल्यापासून ओळखत आहे. त्यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असल्याचं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.
सिद्धूनं केली होती मुख्यमंत्र्यांवर टीका
शुक्रवारी नवज्योत सिंग सिद्धू यांनी अप्रत्यक्षरित्या अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली होती. काही लोक म्हणतात उमेदवार निवडून न आल्यास राजीनामा देईन. पण, मी चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास राजीनामा देईन असं सिद्धू यांनी म्हटलं होतं. पंजाबमध्ये सर्व जागा जिंकण्याचा विश्वास हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला आहे.
सिद्धूच्या पत्नीची अमरिंदर सिंग यांच्यावर टीका
यापूर्वी सिद्धूच्या पत्नीनं देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली आहे. नवज्योत कौर यांनी अमरिंदर सिंह यांनी आशा कुमारी यांची उमेदवारी नाकारल्याचा आरोप केला होता. शिवाय, अमरिंदर सिंग यांना नको असल्यानं सिद्धू पंजाबमध्ये प्रचार करत नसल्याचं नवज्योत कौर यांनी म्हटलं आहे. 13 पैकी 13 जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास अमरिंदर सिंग यांना आहे. म्हणून त्यांनी सिद्धू यांना प्रचार करायला नकार दिल्याचं कौर यांनी म्हटलं आहे.
SPECIAL REPORT: मोदींनी तप केलेल्या गुहेत 'हे' शुल्क देऊन तुम्हीही करू शकता ध्यानधारणा