मुंबई, 07 जानेवारी : मुंबई, 07 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. गेल्या काही काळापासून हे दोन्हीही पक्ष मित्र शोधत होते. आता या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का याविषयी जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. खरंतर गेल्या काही काळात राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर प्रकरणी ईडीची चौकशीदेखील झाली होती आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते.
खरंतर, 2019च्या विधानसभा निवडणुकांमुळे राज्यात एतिहासिक सत्ताबदल उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आणि त्यानंतर भाजप मित्र पक्षाच्या शोधात आहे. तसेच मनसे राज्याच्या राजकारणात बाजूला फेकल्या गेल्यानं त्याही पक्षाला मित्रपक्षाची गरज आहे. त्यातूनच हे दोन पक्ष एकत्र यावेत अशी चर्चा सुरु झाली. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रावादीच्या सोबत गेल्यानं हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्यावरुन निर्माण झालेली स्पेस भरुन काढत पक्षाला नवसंजीवनी द्यावी असं मनसे नेत्यांना वाटतंय.
येत्या 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत गोरेगाव इथे होणार आहे. त्यावेळी राज हिंदुत्वाची भूमिका घेतील तसेच पक्षाचा ध्वजाचा रंगही भगवा होईल अशी चर्चा आहे. ही भूमिका भाजपसाठीही अनुकूल असेल. त्यातूनच आजची भेट झालीये असं मानलं जातंय. आता हे दोन नेते एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्ष येणार का याची चर्चा सुरु झाली आहे.
मनसे भविष्यात भाजपला देणार साथ? बाळा नांदगावकरांचं धक्कादायक विधान
मनसे भविष्यात भाजपची साथ देणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याविषयी एका मराठी वृत्तवाहिनीने प्रश्न विचारला असता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी धक्कादायक विधान केलं आहे.
इतर बातम्या - अशोक चव्हाणांनी 'लेकी'चा व्हिडिओ केला पोस्ट, पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक
बाळा नांदगावकर म्हणाले की, 'भविष्यात मनसे कोणासोबत समीकरण जुळवेल सांगू शकत नाही. पण आम्ही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, शेकाप, राजू शेट्टी या सगळ्यांना मदत केली आहे. त्याचा कोणाला किती फायदा झाला हे सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही कोणासोबत जायचं हा निर्णय पक्षप्रमुख घेतील. पण राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतं. पक्षाने एक लाईन घेतली तर काहीही चमत्कार होऊ शकतो. त्यामुळे सध्या लोकांच्या मनात जे आहे ते घडताना पाहायला मिळेल'
मनसेचा झेंडा बदलणार
येत्या 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचं नवं धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जातंय.
इतर बातम्या - नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी
राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनाला आपली कडवी भूमिका थोडी मवाळ करावी लागली होती. त्यामुळे शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी मनसे नवी भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान मनसेच्या या नव्या भगवीकरणावर पुण्याच्या शिवसैनिकांनी चक्क स्वागत केलंय. काहीनी तर चक्क मनसेला सेनेत विलीन करण्याचा सल्ला दिला. पण हे सांगतानाच शिवसेनेचं हिंदुत्व अद्यापही कडवटच असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.
23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे. याच दिवशी आता राज ठाकरे मराठ अस्मितेसोबतच हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Lok sabha election 2019, Maharashtra, Maharashtra Assembly Election 2019, Narendra modi