नवी दिल्ली, ता.10 ऑक्टोबर : ्#MeToo चळवळीत लैंगिक छळाचा आरोप झालेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे. पक्षाचे प्रवक्ते जयपाल रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. अकबर यांच्यावर चार महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव येतोय. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची हकालपट्टी करा अशी मागणीही होतेय.
रेड्डी म्हणाले, एम.जे. अकबर अतिशय महत्वाच्या पदावर आहेत. त्यांनी त्यांच्यावरच्या आरोपांच तातडीनं खंडण करावं आणि स्पष्टीकरण दिलं पाहिजे. या प्रकरणावर सुषमा स्वराज यांनी जे मौन धारण केलं त्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही टीका केलीय.
त्या म्हणाल्या, सुषमाजी तुम्ही या देशातल्या लाखो मुलींच्या आदर्श आहात. अकबर मंत्री असलेल्या विभागाच्या प्रमुख असल्याने तुम्ही कारवाई केली पाहिजे. काही दिवसांपूर्वी या संदर्भात सुषमा स्वराज यांना एका पत्रकाराने थेट प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी कुठलही उत्तर दिलं नाही. त्यामुळं त्यांच्यावरही टीका होतेय.
अकबर हे 'द टेलिग्राफ', 'एशियन एज' आणि 'द संडे गार्डियन' या वृत्तपत्रांचे संपादक होते. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. संपादक असतानाच्या कार्यकाळात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लिल संभाषण करणं, मद्य पिण्यासाठी आग्रह करणं, आक्षेपार्ह शेरेबाजी करणं असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले आहेत.
#MeToo या मोहिमेत अनेक पत्रकारांवरही आरोप झाले असून त्यामुळं अनेकांना राजीनामे द्यावे लागले होते. बॉलिवूड, पत्रकारीता आणि आता राजकरण्यांवरही आरोप होऊ लागल्याने खळबळ उडालीय. वर्षभरापूर्वी अमेरिकेत MeToo ही चळवळ सुरू झाली होती.
VIDEO: लायसन्स मागितलं म्हणून रिक्षा चालकाने महिला पोलिसाला फरफटत नेलं!