पालघर, 28 मार्च : देशभरात झालेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने गुजरात व राजस्थान इथल्या आपल्या मूळ गावी निघालेल्या शेकडो नागरिकांसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. कारण, गुजरात शासनाने आपल्या सीमा बंद केल्याने हे सर्व नागरिक सीमा भागात अडकून पडले आहेत. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.
करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन घोषित केल्यानं मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. असं असताना गुजरात व राजस्थान भागातील नागरिकांनी आपल्या मूळ गावी जाण्याचं ठरवलं. रेल्वे तसेच इतर सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शेकडोंच्या संख्येने नागरिक गुजरातच्या दिशेने चालत निघाले होते.
ही सर्व मंडळी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर तलासरी तालुक्यातील आच्छाडजवळ पोहोचले असून गुजरात सरकारने आपली सीमा बंद केल्याने शेकडोंच्या संख्येने हे बांधव खोळंबून पडले आहेत. एकीकडे राज्यामध्ये जमावबंदी आणि संचारबंदी आदेश जारी असताना ही सर्व मंडळी एकत्रितपणे रस्त्यावर बसून राहिली असून त्यांमधून तोडगा काढण्यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग व अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
हे वाचा - लॉकडाऊनचा असाही फायदा, तरुणाने 3888 'Push Pins'ने साकारलं उद्धव ठाकरेंचं पोट्रट
या नागरिकांनी आपापल्या ठिकाणी परत जावे व त्यासाठी वाहने पुरवण्याची तयारी राज्य शासनाने दर्शवली आहे. तशा प्रकारच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत. मात्र आपल्याला आपल्या मूळ गावी जाण्याचा या कामगारांचा अट्टाहास असल्यामुळे सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या खोळंबलेल्या शेकडो नागरिकांना जेवणाची सुविधा करण्यासाठी शासकीय व्यवस्था प्रयत्नशील आहे. मात्र या जमावाला पांगविणे हे शासनासमोरील आव्हान राहाणार आहे. अशाच प्रकारे इतर अनेक गुजरात व राजेशस्थान च्या नागरिकांनी आज रात्री आपल्या गावाच्या दिशेने निघणे अपेक्षित आहे.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.