मुंबई,29 ऑगस्ट: मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना पुन्हा एकदा 26 जुलै 2005च्या पावसाची आठवण करून दिली. गेल्या 24 तासात मुंबई तब्बल 225पेक्षा जास्त मिमि. पावसाची नोंद झाली. सकाळच्या तीन तासात तब्बल 65 मिमि. पाऊस कोसळला. अशातच दुपारी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान हायटाईड आल्याने शहरातील रस्त्यांवरील पूरस्थिती आणखीनच गंभीर बनली. त्यामुळे फक्त लोकल रेल्वेसेवाच नाहीतर सावर्जणिक रस्तेवाहतूकही कोलमडून पडलीय, सगळीकडे रस्त्यांवर जणू पूरस्थितीच बघायला मिळत होती.
लोअर पारेल, दादर, कूर्ला, अंधेरी, खार पश्चिम, घाटकोपर, सायन आणि हिंदमाता परिसरात शेकडो वाहनं पावसाच्या पाण्यात अडकून पडल्याचं बघायला मिळालं. कित्येक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. लोकल ट्रेन्स, बीएसटी, टॅक्सी अशी सगळीच वाहतूक सेवा बंद असल्याने दक्षिण मुंबईत कार्यालयात अडकून पडलेल्या शकडो मुंबईकांना उपनगरातील घरांकडे जाणं जवळपास अशक्य होऊन बसलं तर नजीकच्या परिसरात राहणारी लोकं सरळ रस्त्यावरच्या पाण्यातूनच वाट काढत पाईच घराकडे निघाल्याचं बघायला मिळालं. रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा सुरळीत होऊ शकली नव्हती. अशातच हवामान विभागाने बुधवारीही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने उद्याचा दिवस मुंबईकरांसाठी आणखी कसोटी पाहणारा असणारा आहे.
पावसात अडकलेल्यांसाठी अन्नदानाची सोय
पावसाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांनी पावसात रेल्वेस्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी मोफत जेवणाची सोय उपल्बध करून देण्यात आलीय. लालबाग आणि सिद्धीविनायक गणपती मंडळांनी याकामात पुढाकार घेतला. मोफत अन्नदान आणि निवाऱ्याच्या सोयीमुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
मुंबईतील शाळा, महाविद्यालये बंद
सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन राज्याच्या शिक्षण विभागाने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यायांना सुटी जाहीर केलीय.तसंच गरज असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं असं, आवाहन महापालिकेनं केलंय.
मुंबईसाठी नो एन्ट्री
मुंबईतील पुरस्थिती गंभीर बनल्याने पुणे आणि नाशिकहून मुंबईकडे येणारी हायवे वाहतूक सेवा थांबवण्यात आलीय. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्यात. तसंच पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन या दोन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यात.