08 एप्रिल : यवतमाळमध्ये एकाच महिन्याच्या कालावधीत एका बिबट्याची शिकार तर दोन बिबटाच्या नैसर्गिक मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत.
बिबटाच्या शिकारीची घटना यवतमाळ वनपरिक्षेत्रातील भिसनी टाकळी गावात घडलीये. शेळ्यांची शिकार केल्याच्या रागातून शेळीच्या मासावर विषारी औषध टाकून ही शिकार करण्यात आल्याचं वनविभागाच्या चौकशीत पुढं आलंय. तर जोडमोहा वनपरिक्षेत्रातील विठ्ठलवाडी आणि वणी वनपरिक्षेत्रातील एनंद गावात बिबटांचा मृत्यू झाला. पाणी न मिळल्याने नैसर्गिक मृत्यू झाल्याचं वनविभागाच्या चौकशीत उघड झालंय.
भिसनी येथील शिकार झालेला बिबट्या हा जंगलात पाणी न मिळाल्याने नागरीवस्तीत तो पाण्यासाठीच आला होता असा अंदाज आहे. आतापर्यंत एक महिन्यात जिल्ह्यात 3 बिबट्याचा मृत्यू झालाय ही घटना वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी आहे.
वन्यजीवांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावं यासाठी दरवर्षी शासन वनविभागाला पाणवठे तयार करण्यासाठी लाखो रुपय खर्च केले जातात. मग पाण्यासाठी वन्यजीवांना नागरीवस्तीकडे का धाव घ्यावी लागते अथवा पाण्या वाचून तडफडून त्यांचा मृत्यू कसा होतो असा प्रश्न बिबटांचा मृत्यूनंतर आता उपस्थित होतो आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा