12 जानेवारी, सिंदखेड राजा : ''महाराष्ट्राच्या जनतेने भाजपच्या हाती विकासासाठी सत्ता दिली पण भाजपने राज्यातल्या शाळाच बंद करून शिवरायांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे, असा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केलाय. शिवाजी महाराजांच्या भूमीत शेतकरी आत्महत्या होणं हे दुदैव असल्याचं केजरीवालांनी म्हटलंय. जिजाऊ जन्मत्सोवाच्या निमित्ताने अरविंद केजरीवाल आज सिंदखेड राजात आले होते. माँ जिजाऊंना वंदन करून त्यांना भाजपच्या सरकारवर हल्लाबोल केला.
अरविंद केजरीवाल म्हणाले, ''महाराष्ट्रातल्या हजारो शाळा बंद होत आहेत. ज्या पक्षाकडून शाळा चालवल्या जाऊ शकत नाही, ते सरकार काय चालवणार. यांना शाळा चालवता येत नाही, मलाई खाता येते'', असं म्हणत केजरीवाल यांनी शाळांच्या खाजगीकरणावर जोरदार टीका केली.
''महाराष्ट्रातील शाळा खाजगी कंपन्यांना चालवण्यासाठी दिल्या जात आहेत. आता सरकारही खाजगी कंपन्यांकडे द्या, असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं.
''तीन वर्षात दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये क्रांती झाली आहे. एकही शाळा बंद केली नाही, नव्या शाळा सुरु केल्या. दिल्लीतल्या सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल बनत आहेत. हे सगळं दिल्लीत होऊ शकतं, तर महाराष्ट्रात का नाही?'' असा सवालही केजरीवाल यांनी केला.
''दिल्लीतल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व उपचार मोफत होतात, महाराष्ट्रात भरमसाट पैसा मोजावा लागतो'', असंही केजरीवाल म्हणाले.
''दिल्लीचा मुख्यमंत्री झालो तेव्हा देशात सर्वात महाग वीज दिल्लीत मिळत होती, मात्र आज तीन वर्षांनंतर सर्वात स्वस्त वीज दिल्लीत मिळत आहे'', असंही केजरीवाल यांनी सांगितलं.
सिंदखेड राजा इथं भरलेल्या आपच्या मेळाव्यात राज्यातले सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arwind kejriwal, Sindkhed raja, अरविंद केजरीवाल, जिजाऊ जन्मोत्सव, सिंदखेडराजा