जळगाव, 03 जून : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे भाजपचे मोठे नेते आहेत. मी भाजपची खासदार (BJP MP) असल्यानं ते घरी आले. नाथाभाऊंचा विषय सुरू असला तरी या घरात मीही राहते. त्यांमुळं फडणवीस मला भेटायला घरी आले होते, असं स्पष्टीकरण रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी केलं आहे. या विषयात राजकारणासारखं काहीही नसल्याचंही रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.
(वाचा-BREAKING NEWS : राज्यात बारावीची परीक्षा रद्द, लवकरच अधिकृत घोषणा)
देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी जळगावच्या दौऱ्यावर असताना एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन रक्षा खडसे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर या भेटीगाठींमागं काही राजकारण आहे, का याबाबतही विविध मतं पुढं येत होती. मात्र रक्षा खडसे यांनी याबाबत बोलताना अत्यंत स्पष्टपणे भूमिका सांगितली आहे. नाथाभाऊंचा विषय सुरू असला तरी, हे माझंही घर आहे, मीही इथं राहते. मी भाजपची खासदार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस मला भेटायला आले होते. त्यामुळं या विषयाचं राजकारण करण्याची गरज नसल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या.
(वाचा-फेक ओळखपत्र प्रकरण, मीरा चोप्रासोबत 21 श्रीमंतांच्या पोरांनी सुद्धा घेतली लस)
दरम्यान, ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्यामागं महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याची टीका रक्षा खडसे यांनी केली. मराठा समाजाच्या बाजूनं कोर्टात व्यवस्थित म्हणणं मांडलं नाही म्हणून मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं. त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल राज्य सरकारनं व्यवस्थित मांडणी न केल्यानं ओबीसी समाजाचं हे आरक्षण रद्द झाल्याचं रक्षा खडसे म्हणाला. चोपडा इथं या प्रकरणी खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आलं.
राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता, काहीतरी घडणार अशा शक्यता समोर येत आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या भेटीगाठीमागं काहीतरी नक्कीच दडल्याचंही म्हटलं जातं. मात्र फडणवीस यांचं खडसे यांच्या घरी जाऊन चहा-पान करणं यात खरंच काही राजकारण आहे, की केवळ औपचारिकता हेही काही दिवसांत समोर येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.