मुंबई, २१ मार्च- अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूक 2019 साठी देशातील सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. क्रिकेटपासून बॉलिवूडपर्यंत अनेक दिग्गज सेलिब्रिटी निवडणूकांच्या रिंगणात उतरणार असल्याचे म्हटले जात होते. यातलंच एक नाव म्हणजे बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान. सलमान काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याने जाहीर केले होते. तर सलमान भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचे काहींचे म्हणणे होते.
या सगळ्यात सलमानकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता स्वत: सलमानने याबाबत ट्वीट करून स्पष्टीकरण दिले आहे. सलमानने ट्वीट करत म्हटले की, ‘मी कोणत्याही पक्षाकडून येणारी लोकसभा निवडणूक लढणार नाही. त्याचबरोबर निवडणूकीत कोणत्याही पक्षाचा प्रचारही करणार नाही.’
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलिवूडकरांना त्यांच्या चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना स्तःकडे आकर्षित करण्यासाठी सलमान, आमिरसह इतर अनेक मोठ्या सेलिब्रिटींना ट्विटरवर टॅग करत एक पोस्ट लिहिली होती.
Contrary to the rumours I am not contesting elections nor campaigning for any political party..
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 21, 2019
या पोस्टमध्ये नरेंद्र मोदींनी लिहिले की, 'मतदान करणे हे म्हणजे फक्त लोकांचा आधिकारच नाही तर ते त्यांचे कर्तव्यही आहे. हा काळ देशातील युवकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याचा आहे. यामुळे आपण आपल्या देशाला व लोकशाही आणखी मजबूत करू. मोदींच्या या ट्वीटला उत्तर देताना सलमानने लिहिले की,' आपण भारतासारख्या लोकशाही देशात राहतो, त्यामुळे मतदान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्यच आहे. देशातील मतदानाला पात्र असणाऱ्या सर्व युवकांना माझी विनंती आहे की त्यांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे.'
काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशची औद्योगिक राजधानी असलेल्या इंदूरमधून काँग्रेसकडून सलमान लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे एका काँग्रेस प्रवक्याने सांगितले होते. त्यामुळे भाजपचा गेल्या 30 वर्षांपासून बालेकिल्ला असलेलं इंदूर सलमानच्या जोरावर कॉंग्रेस जिंकणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. सलमानचा जन्म इंदूरमध्ये झाला होता. तसेच मुंबईत येण्याआधी सल्लू भाईचे बालपण इंदूरमध्येच गेले आहे. याचा फायदा घेत सल्लूला लोकसभा निवडणूकचं तिकीट देऊन भाजपाचा बालेकिल्ला हस्तगत करायच्या प्रयत्नात काँग्रेस होती. त्यामुळे आता सलमान लोकसभा निवडणूक लढवणार का आणि त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढणार का? या प्रश्नांना स्वत: सलमानने ट्विटवरून पुर्णविराम दिला आहे.
VIDEO: दुष्काळी परिस्थितीशी झगडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मी सदैव पाठिशी - खोतकर