नवी दिल्ली, 9 जानेवारी : आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक मंदिरं (Temple In India) बांधली गेली आहेत. त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. विविध इच्छा घेऊन किंवा मनाच्या शांततेसाठी लोक मंदिरात जाऊन देवापुढे नतमस्तक होतात. प्रत्येक मंदिराचं वेगळं वैशिष्ट्य असतं आणि काही नियम असतात. मोठ्या श्रद्धेने लोक मंदिराच्या नियमांचं पालन करतात. या नियमांपैकी एक नियम म्हणजे चप्पल आणि बूट मंदिराच्या बाहेर काढणं. प्रत्येकाला बूट आणि चप्पल बाहेर काढल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जातो. मंदिरात गेल्यानंतर चप्पल किंवा बूट मंदिराच्या बाहेरच प्रांगणामध्ये काढून ठेवले जातात. कारण, मंदिरात चप्पल किंवा बूट घालून जाणं हा देवाचा अपमान समजला जातो. तुम्हाला माहिती आहे का, की असं एक मंदिर आहे, जिथे चपलांचा हारच देवाला घातला जातो. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. 'झी न्यूज हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कर्नाटकातल्या (Karnataka Temples) गुलबर्गा जिल्ह्यात लक्कम्मा देवीचं (Lakkamma Devi Temple) एक आगळंवेगळं मंदिर आहे. दर वर्षी या मंदिरात फूटवेअर फेस्टिव्हल (Footwear Festival) आयोजित केला जातो. या फेस्टिव्हलमध्ये दूरदूरच्या गावातले नागरिक देवीला चपला अर्पण करण्यासाठी येतात. या उत्सवात प्रामुख्याने गोला-बी नावाच्या गावातले नागरिक उत्साहाने सहभागी होतात. या विचित्र प्रथेमुळे हे देवीचे मंदिर प्रचंड प्रसिद्ध आहे.
दर वर्षी दिवाळीच्या सहाव्या दिवशी लक्कम्मा देवीच्या मंदिरात फूटवेअर फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. लोक आपला नवस पूर्ण करण्यासाठी मंदिराच्या परिसरात असलेल्या झाडांवर बूट आणि चपला टांगतात.
हे ही वाचा-
इस्लाममध्ये सूर्यनमस्काराला परवानगी नाही, केंद्राच्या आदेशाला रझा अकादमीचा विरोध
देवीला चपलांचा हार घातल्यानंतर वाईट शक्तींपासून रक्षण होतं, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या ठिकाणी चप्पल अर्पण केल्याने पायदुखी आणि गुडघेदुखी कायमची दूर होते असाही समज आहे. याशिवाय या मंदिरात मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थही देवीला चढवले जातात. या मंदिरात केवळ हिंदूच नाही, तर मुस्लिम समाजातले नागरिकही आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात.
तसं पाहिलं गेल्यास भारतात देवदेवतांची मंदिरं उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे. प्रत्येक गावात किमान दोन-तीन देवळं आढळतात. मंदिर हे सर्वांत पवित्र स्थान असतं. प्राचीनता आणि मान्यतेमुळे मंदिरं प्रसिद्ध आहेत. अनेक मंदिरांमध्ये लाखो-कोटी रुपयांचं दान जमा होतं. तसंच काही मंदिरांची रचना आणि कारागिरी उत्तम असते. मंदिरांबद्दलच्या अनेक कथा प्रचलित आहेत. हजारो वर्षं जुन्या असलेल्या मंदिरांबद्दल अनेक आख्यायिकाही आहेत. भारतातल्या अनेक मंदिरांचं पौराणिक महत्त्वही मोठं आहे. काही मंदिरं आपल्या नियमांमुळे वादग्रस्त ठरली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.