मुंबई, 22 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचं रौद्र (Heavy Rain in Maharashtra) रुप पाहून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेकांच्या घरादारात पाणी गेलं आहे, तर रस्त्यांवर दरड कोसळल्यामुळे अनेकजण प्रवासातच अडकल्याचं चित्र आहे. अशावेळी पुन्हा एकदा सर्वांच्या जिव्हाळ्याची एसटी मदतीसाठी धावली आहे.
मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला लाल परी धावून आली. कसारा, इगतपूरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने गुरुवारी पहाटे 4 वाजता तातडीने 133 बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे 5800 प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली. (The ST Corporation released the buses on Thursday morning for the passengers at Igatpuri)
मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प् झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे बंद पडल्याने हजारो प्रवाशी कसारा, इगतपूरी स्थानकात अडकून पडले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरीता एसटी महामंडळाने ठाणे (93) व नाशिक (40) विभागातून सुमारे 133 बसेस उपलब्ध करून दिल्या. सदर वाहतूक गुरुवारी पहाटे 4 वाजल्यापासून सुरु करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे 5800 हून अधिक प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आले. त्यामुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
पुणे-मुंबई मार्गावर ७४ जादा गाड्या सोडल्या
पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरीता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा सोडल्या. तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.