मुंबई, 24 जुलै : केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजप आयटी सेलचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला काम' दिल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आज मुंबईत पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपच्या आयटी सेलचे काम करणाऱ्या देवांग दवे याला निवडणूक आयोगाचे आयुक्तांचे फेसबूक पेज ऑपरेट करण्याचे काम देण्यात आले होते. देवांग हा भाजपचा कार्यकर्ता देखील आहे. त्याला निवडणूक आयोगाचे काम कुठल्या आधारावर आणि का दिले? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थितीत केला.
'देवांग दवे हा भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख आहे. तो भारतीय जनता मोर्चाचा पदाधिकारी सुद्धा आहे. त्याने एक खासगी कंपनी स्थापन करून हा सगळा प्रकार केला आहे. तो स्वत:हा मेंबर आय टी बोर्ड ऑफ महाराष्ट्र असं सांगत होता. मी मुख्यमंत्री असताना असे कोणतेही बोर्ड तेव्हा नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे', अशी मागणी चव्हाण यांनी केली.
उदयनराजेंना रोखण्याची आवश्यकता नव्हती, विधानसभा अध्यक्षांचा खुलासा
'या सर्व प्रकरणात कुठल्या तरी पक्षाला मदत करत असल्याचं समोर आलं आहे. या डेटा कंपनीने कुणा-कुणाला मदत केली? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे', असंही चव्हाण यांनी सांगितले.
तसंच, 'देशात सध्या कोरोनाची परिस्थिती सध्या बिकट आहे. अशा परिस्थितीत राम मंदिरापेक्षा कोरोना आपलं पहिलं प्राधान्य हे शरद पवार यांच मत योग्यच आहे', असंही सांगत चव्हाण यांनी समर्थन केले आहे.
'शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा या तिन्ही पक्षाचे सरकार आहे. अनेक विभाग, बदली, अनेक योजना असतात त्यावर चर्चा होते. लोकशाहीमध्येच चर्चा होत असते. सरकारमध्ये कुठेही वाद नाहीत. आम्ही एकत्र आहोत. उलट भाजपकडून सरकारमध्ये वाद हा अपप्रचार केला जातोय', असा आरोपही चव्हाणांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.