औरंगाबाद, 15 फेब्रुवारी : भाजपला महानगरपालिका निवडणुकीआधी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकीकडे नवी मुंबईतही भाजपला मोठं खिंडार पडणार असल्याची चिन्ह आहेत तर दुसरीकडे आता औरंगाबादमध्येही भाजपला गळती लागण्याची शक्यता आहे. कारण भाजपला 11 नगरसेवकांसोबत पाठिंबा देणाऱ्या गजानन बारवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
भाजप समर्थक गजानन बारवाल यांनी काल रात्री मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गजानन बारवाल यांनी 2014 महानगरपालिका निवडणुकीत 11 अपक्ष नगरसेवकांसोबत भाजपला पाठिंबा दिला होता. ते साध्य भाजप कोट्यातून स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे बारवाल हे भाजपचा हात सोडून शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. बारवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
भाजपला नवी मुंबईतही मोठा धक्का बसणार आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटालाच सुरुंग लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबईच्या राजकारणावर आणि महापालिकेवर गेली अनेक दशकं एकछत्री साम्राज्य गाजवणारे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपच्या 5 नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि त्याच्या सोबत असलेल्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यामुळे गणेश नाईकांना जोरदार धक्का बसला.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतल्या सर्व नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्ष ही राष्ट्रवादीची सत्ता आहे. नाईक हे आपल्या सर्वच नगरसेवकांसह भाजपमध्ये आल्याने मुळ भाजपच्या असलेल्या नगरसेवकांमध्ये असंतोषाची भावना आहे. आपल्याला डावललं जातेय अशी त्यांची भावना असून त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Sharad pawar