मुंबई, 21 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा Why I Killed Gandhi या चित्रपटाचा वाद वाढतानाच दिसत आहे. या चित्रपटाचा प्रोमो लॉन्च झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारली आहे. त्यांच्या याच भूमिकेवरुन महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक दिग्गज नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अमोल कोल्हे यांना महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण काँग्रेस (Congress) खपवून घेणार नाही, असा इशाराच दिला आहे. त्यामुळे या चित्रपटाचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. संबंधित चित्रपट हा येत्या 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
"राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न एका विशिष्ठ वर्गाकडून सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करून पुन्हा एकदा गोडसेचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या मारकऱ्याचे उदात्तिकरण कदापी खपवून घेणार नाही", असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
"अमोल कोल्हे कलाकार असले तरी ते एका पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे. कलाकार म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोग करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि नथुरामचे उदात्तीकरण करणे हे दुर्दैवी आहे. नथुराम गोडसेला नायक बनवण्याचा हा प्रयत्न चुकीचा पायंडा पाडणारा आहे. याआधीही काही कलाकारांनी गोडसेच्या भूमिका केल्या. त्यावरही लोकांनी तीव्र नापसंती आणि संताप व्यक्त केला होता. अमोल कोल्हे नथुरामची भूमिका करण्याबद्दल देत असलेले स्पष्टीकरण अत्यंत तकलादू आणि न पटणारे आहे", अशी टीका नाना पटोले यांनी केली.
(अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ)
"नथुरामच्या भूमिकेबद्दल भारतीय जनता पक्षाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया काही नवीन नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व नथुराम गोडसे बद्दलचे विचार सर्वांना माहित आहेत. पण अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करून गांधी हत्येचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. डॉ. अमोल कोल्हे आता कितीही सारवासारव करत असले तरी त्याला काहीही अर्थ नाही. देशातील एका विशिष्ट विचारसरणीचे लोक सातत्याने नथुरामला जिवंत करुन महात्मा गांधींचा अपमान करत असतात. पण 75 वर्षानंतरही महात्मा गांधींच्या विचाराचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट जगातील विविध देश महात्मा गांधींच्या विचाराचा वारसा घेऊन वाटचाल करत आहेत. ही त्यांच्या विचाराची ताकद आहे. आपल्याच देशातील काही लोक मात्र महात्मा गांधींचे विचार पुसण्याचे काम करत आहेत. परंतु गांधी विचार आणि त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान जनता विसरलेली नाही व विसरणारही नाही", असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Mahatma gandhi, Nana Patole, काँग्रेस