मुंबई, 14 मार्च : आघाडीतील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसचे महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सुजय विखे – पाटील यांनी भाजपला हात दिला.त्यामुळा राधाकृष्ण विखे - पाटील काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. गांधी भवनात होणाऱ्या बैठकीत राधाकृष्ण विखे – पाटील राजीनामा देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
तसेच, आघाडीमध्ये मित्र पक्षांना सामील करून घेण्याबाबत देखील चर्चा होणार आहे. एनडीएचे मित्र पक्ष असलेला स्वाभिमान शेतकरी संघटना नाराज असून राजू शेट्टी यांनी आता काँग्रेस – राष्ट्रवादीकडे हात पुढे केला आहे. त्यामुळे राज्यातील समीकरणं निवडणुकीच्या तोंडावर बदलताना दिसत आहेत. आजच्या बैठकीमध्ये घटक पक्षांना जागा देण्याबाबत देखील चर्चा केली जाणार आहे.
नाराज राजू शेट्टींची आघाडी सोबत हातमिळवणी; दोन जागा मिळण्याची शक्यता
राजू शेट्टींना दोन जागा देणार?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता भाजप – शिवसेनेची साथ सोडून आघाडीशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना – भाजप युती झाल्यानंतर मित्र पक्षांची दखल न घेतल्यानं मित्र पक्षांमधील नाराजी दिसून आली. दरम्यान, राजू शेट्टी यांनी आता आघाडीशी जवळीक केली असून आज जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनं काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांची फोनवरून चर्चा झाली. यावेळी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वर्धा किंवा सांगलीची जागा देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हातकणंगले येथे राजू शेट्टी तर काँग्रेसकडून आणखी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
SPECIAL REPORT : माढ्याचा तिढा, कुणाचा खोडा?