नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने एक विशेष योजना तयार केली आहे. या आराखड्यामुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळेल.यामध्ये सरकारने उद्योगांसाठी कर सवलत, अनुदान अशा योजना आणल्या आहेत. उद्योगांवरचा आर्थिक भार कमी करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. त्याचबरोबर भारतात उद्योग करणं उद्योजकांसाठी सोपं व्हावं यासाठीही सरकारने एक प्लॅन बनवला आहे.
सरकारने महसूल विभागाला सोबत घेऊन एक आराखडा बनवला आहे. जे लोक प्रामाणिकपणे कर भरतात अशा लोकांना त्रास दिला जाणार नाही, ज्या करदात्यांनी किरकोळ चुका केल्या असतील त्यांनाही हैराण केलं जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हे जाहीर केलं आहे.
केळी,अंड्यांच्या बिलांची सरकारने घेतली दखल,हॉटेलांवर होणार कारवाई
भारतीय औद्योगिक क्षेत्रात मागणी घटल्याबदद्ल चिंता व्यक्त होते आहे. ग्राहकांच्या हाती जास्त पैसे असले तर मागणी वाढेल आणि मालाची विक्रीही होईल. त्यामुळेच अप्रत्यक्ष दरात कपात करण्याचाही सरकारचा विचार आहे. अर्थव्यस्थेला उत्तेजन देण्यासाठी सरकारने पॅकेज द्यावं, असं असोचॅमचे अध्यक्ष बी. के. गोएंका यांचं म्हणणं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत एक बैठक घेतली आणि त्यांच्या समस्यांबद्दल जाणून घेतलं. या बैठकीत उपस्थित झालेल्या मुद्द्यांच्या आधारे एक पॅकेज तयार केलं जाणार आहे. या पॅकेजची घोषणा लवकरच केली जाईल.
यासोबतच निर्मला सीतारामन कारउद्योगासाठीही एक पॅकेज तयार करण्यावर काम करत आहेत. कारउद्योगावर जीएसटी कमी करण्याची मागणी होते आहे. या पॅकेजमध्ये या मागणीवरही विचार होईल. जुलै महिन्यात गाड्यांच्या विक्रीत सुमारे 36 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळेच कार उद्योगाला या संकटातून बाहेर काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
==============================================================================================
VIDEO : इथं वडापाव विकणारा मदत करतोय, उर्मिलाने बॉलिवूडकरांचे टोचले कान