02 ऑगस्ट : आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आदर्श सोसायटी घोटाळ्याचा अहवाल सादर होईल की नाही याला आता पूर्णविराम मिळालाय. आदर्श अहवाल विधिमंडळात मांडता येणार नाही. 'एटीआर' म्हणजे कृती अहवाल तयार नसल्यामुळे हा अहवाल मांडला जाणार नाही अशी घोषणाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानपरिषदेत केली. विशेष म्हणजे या अहवालातून काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता होती.
त्यामुळे दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला. दिल्लीश्वरांच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांना नरमाईने घ्यावं लागलं आणि अहवाल मांडला जाणार नसल्याची घोषणा करावी लागली अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधासभेत आदर्शचा अहवाल मांडला जाईल असं आश्वासन दिलं होतं. पण आज अजितदादांनी हात झटकले आणि अहवालाचा चेंडून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला.
त्यावेळेस मुख्यमंत्री माझ्या बाजूला बसले होते आणि त्यांनीच असं आश्वासन देण्यास सांगितलं होतं असा खुलासाच अजित पवारांनी केला. त्यामुळे अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना कोंडी करण्याचा प्रयत्न केला.विशेष म्हणजे संसदीय अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेसला कोणतीही जोखीम पत्कारायची नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला गेला अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
दरम्यान, आदर्शचा चौकशी अहवाल मांडण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी विधानसभेचे नेते विनोद तावडे यांनी केलीय. तसंच विधानसभेत निवेदन करूनही आदर्श रिपोर्ट मांडलेला नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात आम्ही हक्कभंग आणू असं तावडेंनी सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा