11 जुलै : अमरनाथ यात्रेकरूवर झालेला हल्ला हा दिल्लीतील मजबूत आणि हिम्मतबाज सरकारवर हल्ला आहे. हा देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्याचा फक्तं ट्विटवरून निषेध करून चालणार नाही असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसंच 1996 ला बाळासाहेबांच्या इशारानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली अशी आठवणही त्यांनी सांगितली.
अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निषेध केलाय. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. १९९६ साली जेंव्हा अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याची धमकी अतिरेक्यांनी दिली होती. तेंव्हा बाळासाहेबा ठाकरेंनी इशारा दिला होता की एका जरी यात्रेकरूंच्या केसाला धक्का लागला. तर आम्ही सहन करणार नाही. मुंबईतूनच नव्हे तर देशातूनच हज ला जाणारे एक ही विमान उडणार नाही. या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेनंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पाडली. आज अशा प्रकारची कठोर भूमिका घेऊन, हे सरकार खऱ्या अर्थाने हिम्मतबाज ५६ इंच छातीचं सरकार आहे. हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे. आता चर्चा नको... आता कोणतीही वैचारीक भूमिका नको.. आता फक्तं या हल्ल्याचा बदला घेणं. आणि देशासमोर एक चांगलं चित्र उभं करणं. ही आमची भूमिका आहे शिवसेनाप्रमुखांनी देखील अशा प्रकारची भूमिका घेतली होती असं परखड मत राऊतांनी व्यक्त केलं.
तसंच या देशात अमरनाथ यात्रा वैष्णोदेवी यात्रा यांना संरक्षण मिळणार नसेल तर ८० कोटी हिंदूच्या देशात वाली कोण ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.