रायचंद शिंदे, 19 मार्च : 'नाचते मी पोटासाठी' हे शब्द आणि ढोलकीची थाप कानावर पडताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो तमाशा.एकेकाळी रसिकांच्या हृदयात आदराचे स्थान असलेल्या तमाशा कलेला आज मात्र उतरती कळा लागलीय. सध्या महाराष्ट्रातील ग्रामदैवतांच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू असून, गावागावात करमणुकीला तमाशा हा असतोच.
ढोलकीची थाप,घुंगरांचा छनछनाट आणि टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट...हा अस्सल गावरान नजराणा सध्या पाहायला मिळतोय गावच्या जत्रेत..आणि हा तमाशा ठरवायचा असेल तर तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगावला जावंच लागणार. इथे ३० फडमालकांनी आपली बुकिंग कार्यालयं म्हणजेच राहुट्या उभारल्या आहेत आणि गावोगावचे पुढारीही सुपारी ठरवण्यासाठी गर्दी करतायेत
गावकुसाबाहेरच्या मोकळ्या रानात फडातील ही मंडळी वेळ मिळेल तसा सराव करतात. उघड्या माळरानावरचा आपल्या मुला-बाळांसोबत हा फिरता संसार सावरत भटकंती सुरू आहे. या कलावंतांचा प्रवासही धोकादायक ट्रकमधून. याच माळरानावर भुकेची भ्रांत मिटवणे आणि साजशृंगारही अर्थात तिथेच. या फडातल्या मंडळींना या वर्षी नोटबंदी आणि आता महागाईचा चांगलाच फटका बसतोय.
बैलगाडा शर्यतबंदी असल्याने त्यावर होणारा खर्च तमाशावर होणार असून, गावकरी कमी बजेटच्या तमाशांना प्राधान्य देत आहेत. महागाईचा मोठा सामना या फडमालकांना सतावतोय. परंतु सावकाराकडून कर्ज घेत या सर्व संकटांवर मात करीत तमाशा फडाचे मालक विविध गावांच्या यात्रांमध्ये करमणुकीसाठी कलेच्या माध्यमातून आपलाही सहभाग नोंदवत खारीचा वाटा उचलताहेत, हे विशेष.
काळ बदलला, महागाई वाढली अन तमाशा ही कला लोप पावू लागली.परंतु वीतभर पोटासाठी आणि संसाराचा रहाटगाडा हाकण्यासाठी हालचाल तर हवीच; मग ती हालचाल कलेच्या माध्यमातून का असेना.दुष्काळ जरी असला, तरी गावची यात्रा होणारच, हाच ट्रेंड सध्या गावा-गावात आहे. पण हाच यात्राकालावधी काडीचा आधार का होईना या तमाशा कलावंतांना जगवतो.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा