14 मार्च : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना पुन्हा एकदा चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा होईपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना दिले आहेत. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याबाबत रत्नागिरीत माहिती दिली.
'कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकरी कर्जातून बाहेर पडला पाहिजे. सातबारा उतारा कोरा झाला पाहिजे. ही मागणी कालही उद्धवसाहेबांची होती आणि आजही आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रत्नागिरीत दिली. त्याचबरोबर, जोपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत हे अधिवेशन चालू देऊ नका, असे स्पष्ट आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सर्व आमदारांना असल्याचंही रामदास कदम सांगितलं आहे.
राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळं आज कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचा गदारोळ पाहायला मिळू शकतो. अधिवेशन सुरु झाल्यापासूनच दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळच सुरु आहे. त्यात आता सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेची भर पडल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिल्यानंतर, शिवसेनेने महाराष्ट्रात त्याच मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शिवसेना सरकारला घरचा आहेर देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा