28 फेब्रुवारी : खंडणीसाठी 10 वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. वर्धन धोडे असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच वर्धनच्या वडिलांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
काल रात्री औरंगाबादमधल्या गुरूकुंज हाऊसिंग सोसायटी, टिळकनगर भागातून साडे आठ वाजता वर्धन धोडे या 10 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं. त्यावेळी त्याच्या घरात पाच कोटींच्या खंडणीची मागणी करणारी चिठ्ठीही टाकण्यात आली होती. मात्र, काही समजायच्या आतच रात्री अकराच्या सुमारास परिसरातील नाल्यामध्ये वर्धनचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अभिलाष महोनपूरकर आणि शाम मगरे यांना रात्री 3 वाजता अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी त्याच परिसरातील रहिवासी आहेत.
रात्री आठच्या सुमारास अभिलाश आणि शाम यांनी वर्धनचे अपहरण करून त्याला कारमध्ये खुलताबादच्या दिशेने नेले. मात्र, वर्धन सुटकेसाठी प्रयत्न करत असताना आरोपींनी त्याला मारहाण करत त्याचा गळा आवळला आणि त्यातच वर्धनचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर आरोपींनी वर्धनचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकून पुन्हा टिळकनगर भागात आले. त्यावेळी वर्धनचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. वेळ पाहता आरोपींनी देखील वर्धनचा शोध घेण्याचं नाटक केलं. कोणाला संशय येऊ नये म्हणून गाडीतला मृतदेह परिसरात असलेल्या नाल्यात फेकून दिला. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. त्यावेळी पोलिसांनी संशय आल्याने अभिलाश आणि शाम याची चौकशी केली. पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबुल करत वर्धनचा मृतदेह नाल्यात फेकल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे.
वर्धनचे वडील बांधकाम व्यावसायिक होते आणि काही वर्षांपूर्वी त्यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे वर्धन सध्या त्याच्या आईसोबत आजोबांसोबत राहत होता. वर्धनच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून झटपट पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी अपहरण आणि हत्या केल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा