30 नोव्हेंबर : मुंबई मेट्रोची दरवाढ तूर्तास टळली आहे. उद्यापासून सुरू होणारी दरवाढ 17 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलीये. मेट्रोने तिकिटांच्या दरात 5 रुपये वाढ केली होती तर पासच्या दरात सरासरी 50 रुपये वाढ केली होती. ही वाढ पुढे ढकलली असली तरी एका वर्षांत दोनदा दरवाढ करणार्या मेट्रो प्रशासनाला सरकारनं अंकुश लावु नये यातंच सरकारचं साटंलोटं आहे, असा आरोप विरोधक करत आहेत.
मेट्रोची दरवाढी दोन आठवड्यांसाठी टळली असली, तरी हे प्रश्न मुंबईकरांच्या मनातून जात नाहीयेत. कारण मुंबई मेट्रो सुरू होऊन 17 महिनेच झाले आहेत आणि तरीही दोनदा भाडेवाढ केली गेलीय. पण सरकार ती थांबवू शकली नाहीये. फक्त विरोध करत असल्याचा आव आणतंय.
एकीकडे शिवसेना भाजप सरकारला आधीच्या सरकारवर अजूनही खापर फोडतंय, तर दुसरीकडे आधीच्या सत्ताधारी अपेक्षा करतायत की त्यांनी केलेल्या चुका आताचं सरकार दुरुस्त करेल.
ट्रॅम ऍक्ट अंतर्गत सुरू झालेला मेट्रोचा प्रकल्प पूर्ण होता होता मेट्रो ऍक्ट अंतर्गत आला. पण भाडं निश्चित करण्याचे अधिकार मेट्रो प्रशासनाला दिल्यामुळे घोळ झाला. आता हा कायदाच बदलला, तर भाडं ठरवणं सरकारच्या हातात राहील.
मुळात पब्लिक ट्रान्सपोर्ट ही सर्वसामान्य लोकांच्या उपयोगासाठी असते. पण मुंबई मेट्रोत मात्र सर्वसामान्यांची अक्षरशः लूट होतेय, अशीच भावना व्यक्त होतेय.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |