20 फेब्रुवारी : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडत नाहीत, ही आमच्यासाठी नामुष्कीची गोष्ट असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केलंय. दाभोलकरांचे मारेकरी सापडत नाहीत हे दुर्देवं आहे असंही अजित पवार म्हणाले. तसंच मारेकर्यांना पकडण्यासाठी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी वेळोवेळी सुचना दिल्या आहेत अशी पाठराखण करत मुख्यमंत्र्यांनी दाभोलकरांच्या खुनामागे कट असल्याचं म्हटलं होतं याचीही आठवणही करून दिली.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज सहा महिने पूर्ण होत आहे. मात्र अजूनही मारेकरी मोकाटच आहेत. पुण्यात 20 ऑगस्ट 13 रोजी ओंकारेश्वर मंदिराजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर नरेंद्र दाभोलकर मॉर्निग वॉकसाठी निघाले असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला.
दाभोलकरांच्या खुनानंतर पुणे पोलिसांनी मारेकर्यांच्या शोधासाठी जंगजंग पछाडले पण पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. पाच महिन्यानंतर नागोरी गँगच्या दोन सदस्यांना बंदुकीच्या बॅलेस्टिक रिपोर्टच्या आधारावर अटक करण्यात आलीय पण मारेकरी कोण हे मात्र पोलीस अजूनही शोधू शकले नाही. आता तर राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सरकारची नामुष्की असल्याची कबुली दिलीय. त्यामुळे दाभोलकरांचे मारेकरी सापडतील का ? यावर प्रश्न निर्माण झालाय.