09 फेब्रुवारी : पुण्यात आज संध्याकाळी एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी मनसेच्या गाड्या टोल न भरताच रवाना होत आहेत. वाशी टोलनाक्यावरुन मनसेचे स्टिकर आणि झेंडे लावून गाड्या टोल न भरताच पुढे निघाल्या आहेत. या टोल नाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
'टोल भरायचा नाही, हा राज साहेबांचा आदेश आहे आणि राज्यभरातून जे आजच्या सभेसाठी पुण्यात येतील, ते टोल भरणार नाही', असं मनसे आमदार नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केल आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पुण्याकडे येताना टोल भरला नव्हता. कोणत्याही टोल नाक्यावर त्यांना अडवलं नव्हतं.
दरम्यान, आज होणार्या सभेच्या जागेवरून बरीच चर्चा झाली होती. एस.पी कॉलेजच्या मैदानावर सभा घेण्याचेच मनसेचे प्रयत्न होते. पण शिक्षण प्रसारक मंडळानं त्याला परवानगी नाकारली होती. त्यानंतर ही सभा नदीपात्रात घेण्याचा निर्णय मनसे कडून घेण्यात आला होता.
मात्र, शुक्रवारी पोलीस अधिकार्यांच्या उपस्थितीत काही बड्या नेत्यांच्या मध्यस्थीने एसपी कॉलेजवर दबाव आणून, सभेला परवानगी मिळवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सभेच्या परवानगीचे पत्र मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्याचं समजतंय. मात्र, परीक्षांचे दिवस असल्याने अटीही लागू केल्या. सभास्थानी फटाक्यांची आतषबाजी, हुल्लडबाजी करण्यास मनसेला मनाई करण्यात आली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभास्थानावरुन सुरू असलेला गोंधळ मिटलाआहे. पुण्यातील सर परशुरामभाऊ (एस.पी.) महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी सभा होईल. राजकीय कार्यक्रमांना मैदान न देण्याचा एस.पी.चा पायंडा यामुळे मोडणार आहे. या मैदानावरची शेवटची राजकीय सभा तीस वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच घेतली होती, हे विशेष.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा