04 फ्रेबुवारी : राज्यभरात आज (मंगळवार)चा दिवस आंदोलनांचा ठरलाय. ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांनी बारावीच्या परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकलाय. त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.
ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या या आंदोलनाला, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांच्या संघटनेनंही पाठिंबा दिलाय. यामुळे बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेवर चिंतेची गडद छाया आहे. 6 फेब्रुवारीपासून 12 वीच्या या परीक्षा सुरू होणार आहे.
आणि राज्यभरात बारावीच्या 13 लाख विद्यार्थ्यांना बहिष्काराचा फटका बसणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या सरकारनं पूर्ण न केल्यानं संपाचं हे हत्यार उपसण्यात आलंय. शिक्षणमंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्यानं प्राध्यापक आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. मागण्या मंजूर झाल्याशिवाय बहिष्कार मागे न घेेण्याचा निर्णयही संघटनेनं घेतलाय.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
अंगणवाडी सेविकांचं आंदोलन चिघळलं
6 जानेवारीपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. हा संप आता चिघळलाय. 23 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाला भेट दिली. तरीही या संपावर तोडगा निघालेला नाही. गेल्या 30दिवसात विविध प्रकारची आंदोलनं राज्यात करण्यात आली. आज, आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केलंय.. संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अंगणवाडी शिष्टमंडळाला भेटीला बोलावलंय.
प्रहार संघटनेचं शिवाजीराव मोघेंच्या घरासमोरन ठिय्या
राज्यभरातल्या अपंग संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून आंदोलन सुरू केलंय. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेनं सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या बंगल्यासमोरचं ठिय्या मांडलाय. मोठ्या संख्येनं राज्यभरातील अपंग या आंदोलनात सहभागी झालेत. अपंगांच्या मागण्यांसंदर्भात आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे.
राज्य कर्मचारी महासंघ संपावर
राज्य कर्मचारी महासंघानं येत्या 13 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिलाय. पाच दिवसांचा आठवडा असावा या प्रमुख मागणीसाठी महासंघाची आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बैठक झाली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्य कर्मचारी महासंघानं संपाचा इशारा दिलाय. 18 लाख कर्मचारी सोबत असल्याचा दावा महासंघानं केलाय.