चंदिगड : मोदी सरकारने नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन कधीच दिलं नव्हतं, असं भाजपच्याच एका मंत्र्यांनी म्हटलं आहे. विरोधक आमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं.
भाजपच्या स्थापनादिनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांनी चंदिगडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली.काँग्रेसच्या न्याय योजनेवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस नेत्यांना खोटं बोलण्याची सवय आहे, असं ते म्हणाले.
काळा पैसा परत आला तर...
देशातला काळा पैसा परत आला तर आम्ही प्रत्येक कुटुंबाला 15 लाख रुपये देऊ, असं भाजप नेतृत्वाने म्हटलं होतं. पण हे वचन आम्ही जाहीरनाम्यामध्ये कधीच दिलं नव्हतं, असं कलराज मिश्रा यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कधीच असं वक्तव्य केलं नव्हतं हे त्यांनी ठासून सांगितलं.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि राहुल गांधींनी 15 लाख रुपयांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यावर कलराज मिश्रा यांनी हे उत्तर दिलं.
काँग्रेसमुक्त भारत
काँग्रेसमुक्त भारत या घोषणेचा अर्थही त्यांनी समजावून सांगितला. आम्ही या देशातून काँग्रेसला भारतातून हटवणं, असा होत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आम्हाला या देशाची भ्रष्टाचारातून सुटका करायची आहे, असं ते म्हणाले.
आमच्याआधी काँग्रेस सरकार 10 वर्षं सत्तेत होतं पण तेव्हा त्यांनी गरिबांसाठी काही का केलं नाही, असा सवाल त्यांनी विचारला. न्याय योजनेतले पैसे ते लोकांना कसे देऊ शकणार आहेत हे त्यांनी सांगितलं नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.
कलराज मिश्रा यांच्यावर भाजपच्या हरियाणा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. चंदिगडमध्ये घेतलेल्या परिषदेत त्यांनी भाजपची बाजू लावून धरली.
===================================================================================================================================================================
VIDEO : तुमचा जाहीरनामा जैश-ए-मोहम्मदचा का? मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना सवाल