वाराणसी, 14 फेब्रुवारी : राजधानी दिल्लीत झालेल्या बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाराणसीत एका व्यावसायिकाने नुकसान आणि कर्जाला कंटाळून पत्नी आणि मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत्यूआधी पोलिसांना स्वत:हून आत्महत्या करणार असल्याची माहितीसुद्धा दिली. पोलिसांना तपासावेळी 12 पानी सुसाइड नोट मिळाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाराणसी शहरातील आदमपूर भागात चेतन तुलस्यान त्यांच्या कुटुंबियासंह राहत होते. घरी आई-वडिल, चेतन यांची पत्नी ऋतू, मुलगा हर्ष आणि मुलगी हिमांशी राहत होते. पहाटे 4.35 च्या सुमारास त्यांनी सहकुटुंब आत्महत्या करत असल्याची माहिती पोलिसांनी फोनवरून दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेच कॉल केला पण तो उचलला नाही. अखेर पोलिसांनी त्यांचा शोध घेत घरी धाव घेतली. चेतन यांच्या वडिलांनी दरवाजा उघडला.
पोलिसांनी घरामध्ये पोहचताच चेतन यांच्याबद्दल चौकशी केली. त्यावर त्यांच्या वडिलांनी ते रूममध्ये असल्याचं सांगितलं. जेव्हा रूमचा दरवाजा उघडला नाही तेव्हा दरवाजा तोडला. त्यावेळी एका खोलीत मुलगा हर्ष आणि मुलगी हिमांशी यांचे मृतदेह होते. तर दुसऱ्या खोलीत चेतन यांची पत्नी ऋतुचा मृतदेह बेडवर होता तर चेतन यांनी स्वत:ला फासावर लटकवून घेतलं होतं. आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. त्याठिकाणी पोलिस महानिरिक्षक विजय सिंग मीना, विशेष पोलिस अधीक्षक प्रभाकर चौधरी आणि पोलिस अधीक्षक दिनेश कुमार सिंग पोहचले.
चेतन यांच्या रूममध्यो पोलिसांना 12 पानी सुसाइड नोट मिळाली आहे. यामध्ये त्यांच्या पत्नीने म्हटलं आहे की, ज्यावेळी लग्न झालं तेव्हा वाटलं होतं की एका आनंदी कुटुंबात माझं लग्न झालं. पण नंतर पतीच्या आजारपणाबद्दल समजलं. कुटुंबाकडून कोणत्याच प्रकारचं सहकार्य मिळत नव्हतं. सुसाइड नोटमध्ये मुलांनी म्हटलं की, आम्हाला झोपेच्या गोळ्या द्या आणि झोप लागल्यानंतर गळा दाबा.
पोलिसांनी सांगितलं की, चेतन यांच्या घरी सुसाइड नोट आणि औषधे मिळाली आहेत. प्राथमिक तपासावरून आत्महत्येची पूर्ण तयारी केली होती आणि एकमेकांच्या परवानगीने हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुसाइड नोटशिवाय एका स्टँप पेपरवर लिहिलेलं अॅफिडेविटसुद्धा मिळालं आहे. गेल्या महिन्यात 22 जानेवारीला ते तयार करण्यात आलं होतं. यावर मृत्यू पश्चात संपत्ती गोरखपूरमध्ये राहणाऱ्या मेव्हण्याला द्यावी असं म्हटलं आहे.
वाचा : प्रियकराने प्रेयसीला खूश करण्यासाठी तिच्या वडिलांनाच संपवलं
गेल्या चार महिन्यात वाराणसीमधील ही दुसऱी घटना आहे. याआधी हुकुलगंज इथं असा प्रकार घडला होता. 30 ऑक्टोबरला किशन गुप्ता यांनी पत्नी आणि मुलांसह आत्महत्या केली होती. त्यांनीही कर्जाला आणि आजारपणाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं होतं.
वाचा : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, प्रेमी युगुलाचं जबरदस्तीने लावलं लग्न