लखनऊ, 28 जुलै : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात, मात्र सध्याच्या पिढीने तर कहर केला आहे. अशीच एक अजब घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. एका 19 वर्षीय मुलीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून स्वत:चं अपहरण केलं. हे सगळं करण्यामागचं कारण म्हणजे वडिलांकडून मिळणारे पैसे. या तरुणीनं स्वत:चं अपहरण केल्यानंतर वडिलांना फोन केला आणि त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. मात्र पालकांमुळे आणि पोलिसांमुळे या दोघांचं पितळं उघडं पडलं.
इंडिया टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार उत्तर प्रदेशातील नगला भजना या गावात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 जुलै रोजी मुलगी बेपत्ता झाली, म्हणून पालक चिंतेत होते. मात्र थोड्या वेळाने अपहरणकर्त्याने फोन केला, आणि त्यांच्याकडे तब्बल 1 कोटींची खंडणी मागितली. तसेच, पैसे न दिल्यास मुलीला मारून टाकू अशी धमकी दिली. मात्र मुलीच्या वडिलांनी थेट पोलिसांना संपर्क केला, आणि या प्रकरणाबाबत माहिती दिली.
वाचा-14 वर्षीय मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी भाजप आक्रमक, आरोपींच्या फाशीची मागणी
पोलिसांनी कारवाईला सुरू केल्यानंतर सर्वात आधी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की अपहरणकर्ता सतत फोन करून खंडणी मागत होता. त्यावरून पोलिसांनी मुलीचा फोन नंबर ट्रेस करण्यास सुरुवात केली. पोलीस अधिक्षक राहुल कुमार यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, “फोन ट्रेस केल्यानंतर कळले की मुलगी आपल्या फोनवरून घरी खंडणीसाठी मागणी करत होती. घरापासून अगदी 100 मीटरच्या अंतरावर पोलिसांना ही मुलगी आढळली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना या प्रकरणाचा उलगडा झाला. हे दोघं 2 वर्षांपासून एकमेकांसोबत असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले.
वाचा-माणुसकी हरपली! कोरोनामुळे मृत बिल्डरच्या बॅंक खात्यावरच कर्मचाऱ्याचा डल्ला?
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या मुलीला घरी 1 कोटी असल्याचे कळले होते, मुलीचे वडिल एक शाळा सुरू करणार होते. त्यासाठी त्यांनी हे पैसे जमवले होते. हे कळल्यानंतर या मुलीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून अपहरणाचा प्लॅन रचला. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले असून, तिचा बॉयफ्रेंड मात्र फरार आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.