नवी दिल्ली, 22 जानेवारी : ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेनं अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. या माहितीपटावरून वाद निर्माण झाला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठात या वादग्रस्त माहितीपटाच्या स्क्रीनिंगचा प्रयत्न झाला. यावेळी प्रशासनाकडून वीजपुरवठा आणि इंटरनेट खंडित करण्यात आले असा आरोप झाला आहे.
बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावर मोदी सरकारने मोठी कारवाई करत यूट्यूबवर बीबीसी डॉक्युमेंटरी शेअर करणारे व्हिडिओ ब्लॉक केले आहेत. यासोबतच बीबीसी डॉक्युमेंटरीची यूट्यूब लिंक शेअर करणारे ट्विटही ब्लॉक करण्यात आले आहेत. पण, तरीही हा व्हिडीओ लिक झाला आहे.
या ना त्या वादामुळे चर्चेत राहणाऱ्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठात हा माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे नवीन वाद उफाळला आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेने मंगळवारी रात्री ९ वाजता माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आले. जेएनयू प्रशासनाने हे आयोजन रोखले.
(परीक्षेला हिजाब घालून बसण्याची परवानगी द्या, विद्यार्थीनींची सर्वोच्च न्यायालयात धाव)
विद्यापीठातील वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवा खंडित केले, असा संघटनेचा आरोप केला आहे. या प्रकारामुळे विद्यापीठात एकच गोंधळ उडाला. दोन गट आमने-सामने आले होते. त्याचदरम्यान अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, असा आरप जेएनएसयू संघटनेने केला. या घटनेमुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांनी डॉक्युमेंटरीची चौकशी केली
दरम्यन, परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयासह अनेक मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी डॉक्युमेंटरीची तपासणी केली आहे आणि त्यात प्रशासनाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेला कलंक असल्याचे आढळून आले आहे. तसंच विविध भारतीय समुदायात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सांगितला आहे. सूत्रांनी सांगितले की माहितीपट भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळले आहे. यात परदेशी सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध तसेच देशातील सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरित परिणाम करण्याची क्षमता आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने आरोप फेटाळले
तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. हा 'प्रचाराचा एक भाग' असल्याचे म्हटलं आहे. यात स्पष्टपणे पक्षपातीपणा, वस्तुनिष्ठतेचा अभाव आणि वसाहतवादी मानसिकता दर्शवते, असेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. बीबीसीने 'इंडिया: द मोदी प्रश्न' नावाची एक नवीन दोन भागांची मालिका बनवली आहे. ही मालिका गुजरातमधील 2002 च्या दंगलीवर भाष्य करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.