नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : महाराष्ट्र काँग्रेसने कोरोनाच्या पहिल्या लाटेत (Coronavirus) मुंबईतील उत्तर भारतीय श्रमिकांना मोफत रेल्वे तिकीटे दिली आणि त्यामुळे कोरोना उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंडमध्ये पसरला असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभेत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी भाजपवर पलटवार केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही सवालही केले आहेत. (Supriya Sule replied to PM Narendra Modi statement about covid spread)
मोदींच्या वक्तव्याने प्रचंड वेदना झाल्या
सुप्रिया सुळे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काल भाषण झालं. खूप अपेक्षेने मी त्या भाषणाकडे पाहत होती कारण, फार अडचणीच्या काळात आपला देश चालला आहे. महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. कोविडची तिसरी लाट आता ओसरत आहे. चीनचा मुद्दा आहे. नोकरीचा मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या भाषणाकडे फार अपेक्षेने पाहत होतो. पण दुर्दैवं असं की, आपल्या महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान जे बोलले त्याबद्दल मला प्रचंड वेदना झाल्या. ज्या राज्याने 18 खासदार भाजपला निवडून दिले, नरेंद्र मोदी आज पंतप्रधान आहेत त्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्राचाही आहे. त्याच महाराष्ट्राचा उल्लेख पंतप्रधानांनी कोरोनाचा सुपरस्प्रेडर म्हणून केला, हे खूपच धक्कादायक आहे.
मोदीची पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान
हे भाजपचे पंतप्रधान नाहीयेत तर संपूर्ण देशाचे, तुमचे-आमचे पंतप्रधान आहेत. एकदा निवडून आल्यावर ते आपले पंतप्रधान होतात. ते पद पक्षाचे नाहीये तर संविधानिक आहे. पंतप्रधान देशाचे असतात असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
वाचा : '...आणि मुंबईतला कोरोना थेट युपी-बिहारमध्ये पोहोचला', पंतप्रधानांचा लोकसभेत गंभीर आरोप
श्रमिक ट्रेन्सचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी कुठल्या राज्यातून किती ट्रेन्स गेल्या याची माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ट्रेन्स महाराष्ट्र सरकार देत नाही तर केंद्र सरकार चालवतं. गुजरातमधून 1033 ट्रेन्स, महाराष्ट्रातून 817, पंजाबमधून 400 श्रमिक ट्रेन्स गेल्या. केंद्र सरकार ठरवतं कुठली ट्रेन कुठून आणि किती वाजता जाणार. त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्राबद्दल जे म्हटलं त्यामुळे मला प्रचंड वेदना होत आहेत. मला भारतातील प्रत्येक राज्याबद्दल प्रेम आणि अभिमान आहे.
पियूष गोयल यांचे मी अनेकदा आभारही मानल आहेत त्यावेळी रेल्वेमंत्री असताना. त्यावेळी पियूष गोयल यांनी केलेल्या ट्विट्सचा उल्लेख सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केला. पियूष गोयल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करत म्हटलं होतं, उद्धवजी आशा आहे की तुमची तब्येत ठिक आहे. उद्या आम्ही महाराष्ट्राला 125 श्रमिक ट्रेन्स देण्यासाठी तयार आहोत.
वाचा : यूपी, पंजाब, उत्तराखंडमध्ये काँग्रेसमुळे वाढला कोरोना, मोदींचे 'कोविड कार्ड'
फडणवीसांनी मानले होते पियूष गोयलांचे आभार
यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन पियूष गोयल यांचे आभार मानले होते. 9 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं होतं की, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचे आभार, त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली आणि लवकरच मुंबईहून उत्तरप्रदेशसाठी गाडी रवाना होईल असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
माणुसकी विसरलो का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही काल महाराष्ट्राबद्दल म्हटलं, पण त्यांच्याच पक्षाचे नेते काहीतरी वेगळे बोलतात. हरीश द्विवेदी यांनीही श्रमिक ट्रेनचा उल्लेख केला होता. भाजपचे खासदार ऑन रेकॉर्ड महाराष्ट्राचे आभार मानलेत. आमच्या छत्तीसगड, झारखंड, यूपी असेल तसेच त्यांचे आम्हाला फोन आले आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा पार्लमेंटमध्ये महाराष्ट्र सरकारचे आमच्या सगळ्यांचे आभार मानले. पण आता माणुसकी विसरलोय का? असा सवालही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Narendra modi, Supriya sule