नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेला वाद आता आणखी विकोपाला गेला आहे. दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदारून सुरु झालेला वाद इतक्या टोकाला गेला की एकत्र निवडणूक लढवल्यानंतर दोन्ही पक्ष आता वेगळे झाले आहेत. शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळातील एकमेव मंत्र्याला राजीनामा द्याला लावला. त्यानंतर आता शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे समोर येत आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यापासून म्हणजे गेल्या 30 वर्षात असे प्रथमच होत आहे की NDAच्या बैठकीस उपस्थित राहणार नाही.
राज्यातला तिढा दिल्लीत सुटणार, शरद पवार आणि सोनिया यांच्यात उद्या बैठक
यासंदर्भात शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, NDAच्या बैठकीसाठी भाजपकडून शिवसेनेला आमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेनेकडून कोणताही प्रतिनिधी बैठकीसाठी जाणार नाही. दिल्लीत सध्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर NDAच्या घटक पक्षांची बैठक उद्या होणार आहे. लोकसभेत सत्ताधारी गटातील भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष असलेला शिवसेना मात्र या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
Shiv Sena leader Sanjay Raut on being asked if Shiv Sena will go for NDA meeting in Delhi ahead of Parliament session?: No, Shiv Sena will not go. pic.twitter.com/5NbDmFRe50
— ANI (@ANI) November 16, 2019
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे मोदी सरकारमधील एकमेवर मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच शिवसेना NDAतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे बोलले जात होते. आता सेनेने NDAच्या बैठकीस न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा परिणाम प्रथमच दिल्लीतील संसदीय राजकारणात दिसून येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपला शिवसेनेची साथ नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. संसदेतील अनेक विधेयकांसाठी काँग्रेस आघाडीच्या UPAविरुद्ध शिवसेनेची साथ गरजेची असते. आता बैठकीला उपस्थित न राहून शिवसेनेने NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या या निर्णयाचा थेट फायदा UPAला होऊ शकतो अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे संसदेतील गटनेते सर्व पक्षीय बैठकीस उपस्थित राहणार आहेत. मात्र सेनेने NDAच्या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री करायचं तरी कोणाला? शिवसेनेसमोर यक्ष प्रश्न
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर सरकारमध्ये समान वाटा हवा यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद निर्माण झाला. भाजप मुख्यमंत्रीपदावर तडजोड करण्यास तयार नाही. तर शिवसेना लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरल्याप्रमाणे वागा असा हट्ट करत आहे. भाजप आणि सेना यांनी वेगळ होण्याचे ठरवल्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 3 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापनेचा विचार करत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील ती मान्य करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, NDA, Sanjay raut, Shiv sena