नवी दिल्ली 8 जुलै : राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जो गोंधळ निर्माण झाला तो कमी होण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री करणसिंह यांनी एक पत्र लिहून या गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर तातडीने नव्या अध्यक्षांची नियुक्ती व्हायला पाहिजे होती. मात्र त्यांचं मन वळविण्यात अनेक दिवस वाया घालविण्यात आले अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
करणसिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की, राहुल गांधी यांनी राजीनामा देऊन धाडसी निर्णय घेतलाय. त्यांच्या निर्णयाचा सन्मान करायला पाहिजे होता. मात्र असं न करता त्यांचं मन वळविण्यात पक्षाने आपला वेळ वाया घातला. आता वेळीच जागे होत निर्णय घेतला पाहिजे. सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेऊन हंगामी अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांची किंवा उपाध्यक्षांची नियुक्ती केली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
लोकसभेतल्या पराभवानंतर 25 मे रोजी राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्ष आणखीच भरकटल्याचं दिसून येत आहे असंही करणसिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
राहुल गांधी अमेठीला जाणार
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पराभवानंतर पहिल्यांदाच अमेठीला जाणार आहेत. आता ते काँग्रेसचे अध्यक्षही नाहीत आणि अमेठीचे खासदारही नाहीत पण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी ते अमेठीला जाणार, अशी माहिती आहे.
याआधी राहुल गांधी 3 वेळा अमेठीचे खासदार राहिले आहेत. या 15 वर्षांच्या कारकिर्दीनंतर आता मात्र ते एक सामान्य नेते म्हणून अमेठीला जातील. त्यांचा हा अमेठी दौरा १० जुलैला होणार आहे.
बालेकिल्ला उद्ध्वस्त
अमेठीला आतापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होतं. इथे काँग्रेसची चांगली ताकद असतानाही या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला. त्यांनी राहुल गांधींपेक्षा 55 हजार जास्त मतं मिळवत काँग्रेसचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष कोण याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. त्यातच राहुल गांधी पराभवानंतर दीड महिन्यांनी अमेठीचा दौरा करत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा