नवी दिल्ली, 29 मार्च : राहुल गांधींची रद्द झालेली खासदारकी, यानंतर त्यांनी केलेलं सावरकरांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य, शरद पवार आणि शिवसेनेची भूमिका ते महाराष्ट्राचं राजकारण. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नेटवर्क 18 च्या कार्यक्रमात त्यांची भूमिका मांडली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी अमित शाह यांची मुलाखत घेतली.
अमित शाह यांच्या मुलाखतीमधले महत्त्वाचे मुद्दे
राहुल गांधींना कोणता अहंकार?
काँग्रेस नेते भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला 2 वर्षांची शिक्षा झाली तर प्रत्येक व्यक्तीला शिक्षेला आणि दोषाला स्टे करायला 3 महिन्यांचा वेळ मिळायचा. कनव्हिक्शन स्टे करता येत नाही, शिक्षा स्टे करता येते. पण थॉमस केसमध्ये सुप्रीम कोर्टाने 3 महिन्यांचं प्रावधान काढून टाकलं. लालूंना वाचवण्यासाठी मनमोहन सरकार अध्यादेश घेऊन आले. पण तो अध्यादेश राहुल गांधींनी फाडला. तो अध्यादेश असता तर राहुल गांधींची खासदारकी वाचली असती.
राहुल गांधींनी अजूनही या निकालाला आव्हान दिलेलं नाही, त्यांच्यात कोणता अहंकार आहे? लालू प्रसाद यादव, जयललिता, राशिद अल्वी यांच्यासह 17 जणांची खासदारकी गेली. पण कुणीही काळे कपडे घातले नाहीत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. देशाच्या एका व्यक्तीसाठी कायदा बदलायचा का? असा सवाल अमित शाह यांनी विचारला.
ते कायदा वाचणार नाहीत, त्यांना समजणारही नाही. पण काँग्रेसकडे राज्यसभेत बसणारे मोठे वकील आहेत, तेही काही समजावत नाही. लोकसभा अध्यक्षही काही करू शकत नाहीत. ज्या वेळी तुम्ही दोषी ठरलात तेव्हाच तुमचं सदस्यत्व गेलं, असं अमित शाह म्हणाले.
त्यांना मोदी विरुद्ध राहुल करूदे, भाजपसाठी विजयाचा यापेक्षा मोठा फॉर्म्युला कोणता असेल? त्यांनी फक्त मोदींना नाही, तर मोदी समाज म्हणजेच तेली समाजाविषयी ते बोलले. सगळ्या चोरांचं आडनाव मोदीच का असतं? असं ते म्हणाले. त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला, असा आरोप अमित शाह यांनी केला.
शरद पवारांचं ऐका
माफी मागायची नव्हती तर त्यांनी जामिनाचा अर्जही नाही करायला पाहिजे होती. गांधींना ब्रिटिशांनी शिक्षा दिली तेव्हा त्यांनी दंड भरला नाही, माफीही मागितली नाही. माफी मागायची नसेल तर मागू नका, पण सावरकरांबाबत असं वक्तव्य करू नका. या देशात सर्वाधिक यातना सहन करणाऱ्यांपैकी सावरकर आहेत. स्वातंत्र्याच्या संग्रामात एकाच व्यक्तीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली. अशा वीर हुतात्मांसाठी असे शब्द प्रयोग करणं चुकीचं. आमच्यावर विश्वास नसेल, तर त्यांनी त्यांची आजीचं त्यांनी ऐकावं. शिवसेना शरद पवार काय म्हणत आहेत, ते ऐकावं, असा सल्ला अमित शाह यांनी राहुल गांधींना दिला.
लालूंची खासदारकी गेली तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का? फक्त गांधी परिवाराची खासदारकी गेली तरच लोकशाही धोक्यात येते का? असा सवाल शाह यांनी विचारला.
मोदी विरुद्ध कोण?
चंद्रशेखर राव, तृणमूल काँग्रेस, समाजवादी आणि काँग्रेस या चारही पक्ष मोदी विरुद्ध सगळे असे एकत्र आले तर, चंद्रशेखर राव यांची उत्तर प्रदेशमध्ये सभा ठेवली तर काय फरक पडेल? ममतांची सभा तेलंगणामध्ये ठेवली तर काय फरक पडेल? यादव साहेबांची सभा बंगालमध्ये ठेवली तर काय फरक पडेल? हे सगळे त्यांच्या त्यांच्या राज्यात आमच्याविरोधात लढत आहेत. एकता तुमचा टीआरपी वाढवण्यासाठी आहे. कोणीही एकमेकांना नेता मानत नाही आणि एकमेकांना सीट द्यायला तयार नाहीत. ममता, चंद्रशेखर राव आणि यादव यांनी एकमेकांना ५-५ सीट देऊन दाखवाव्या, असं आव्हान अमित शाह यांनी दिलं.
ईडी-सीबीआयचा गैरवापर नाही
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपने आश्वासन दिलं होतं, आमची लढाई भ्रष्टाचाराविरोधात आहे. २००४ ते २०१४ या काळात ईडीने ५ हजार कोटींची संपत्ती जप्त केली. मोदींच्या काळात १ लाख १० हजार कोटींची संपत्ती जप्त केली. यातले ५ टक्केही राजकारण्यांचे नाहीत. हे पैसे अधिकारी, भ्रष्ट व्यापाऱ्यांचे आहेत. ही लढाई बंद करायची का?
9 वर्षांत सीबीआयने भ्रष्टाचाराच्या ५ हजार केस टाकल्या, काँग्रेसने ५०० देखील टाकल्या नाहीत. या सगळ्या केस राजकारण्यांविरोधात नाही. लालूंविरोधात केस युपीएने केल्या होत्या.
आणीबाणी लावून काँग्रेसने १९ महिने लोकांना जेलमध्ये टाकलं, त्यांना जामिनही मिळाला नाही. इकडे तर तुम्हाला जामीनही मिळतो.
मी गुजरातमध्ये गृहमंत्री होतो तेव्हा मोदींचं नाव घ्या तुम्हाला सोडून देतो, असं सीबीआयने सांगितलं. मोदींविरोधात एसआयटी बनवली. दंगलीची खोटी केस बनवली. मला अटक केली, ९० दिवसात मला सोडलं. राजकीय इशाऱ्यावर सीबीआयने केस केली, असं हायकोर्टाने सांगितलं. आम्ही काळे कपडे घातले नाहीत. भाजपमध्ये गेल्यानंतर केस बंद होतात, असं वाटत असेल तर कोर्टात जा. कोर्ट सीबीआय-ईडीला ऑर्डर देईल, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं.
शिवसेनेसोबत युती
महाराष्ट्रात आम्ही आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढलो. फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो. यानंतर उद्धव मुख्यमंत्री बनले, पण जनतेत गेले तेव्हा आयडियोलॉजिकल मतभेद दिसायला लागले. आमदार पळाले ते आमच्यामुळे नाही तर जनतेच्या दबावामुळे पळाले. असली शिवसेना आमच्यासोबत एकत्र आली. निवडणूक लढवू आणि जिंकूही. भाजप एकटी लढली असती तर पूर्ण बहूमत मिळालं असतं. पण शिवसेना जुनी मित्र होती, म्हणून त्यांच्यासोबत युती केली. २०२४ मध्ये शिवसेनेसोबत सीट शेअरिंग करू, जागा वाटपाबाबत बसून निर्णय करू, असं अमित शाह म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Rahul gandhi