नवी दिल्ली, ६ मार्च : भारत आणि बांग्लादेशच्या सीमेवरची घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर एक अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. आसाममधल्या ढुबरी जिल्ह्यात सीमेवर स्मार्ट फेन्सिंग तयार करण्यात येत आहे. याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं.
भारत आणि बांग्लादेशमधली ही सीमारेषा 61 किलोमीटर लांब आहे. या सीमेवर ही यंत्रणा बसवली जाणार आहे. बांग्लादेश आणि भारताच्या सीमारेषेपैकी आसाममधल्या ढुबरी भागात भौगोलिक प्रदेशामुळे संरक्षणात बऱ्याच अडचणी येतात. पावसाळ्याच्या दिवसांत तर या भागाचं संरक्षण करणं जास्त कठीण जातं.
ही समस्या दूर करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमा सुरक्षा दल आधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून सीमेवर ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या स्मार्ट फेन्सिंगला सेन्सर बसवलेले असतात. त्यामुळे घुसखोरीची माहिती ताबडतोब मिळू शकते. यामध्ये डाटा नेटवर्क, ओएफसी केबल, डीएमआर कम्युनिकेशन, दिवसरात्र हालचाली टिपणारा कॅमेरा ही सगळी यंत्रणा आहे.
ही अत्याधुनिक यंत्रणा सीमा सुरक्षा दलाच्या कंट्रोल रूममध्ये सगळी माहिती पोहोचवते. त्यामुळे या दलाच्या क्विक रिअॅक्शन टीम अलर्ट होऊ शकतात. या यंत्रणेमुळे सीमेवरची घुसखोरीही थांबेल. शिवाय सीमेवर प्रत्येक ठिकाणी गस्त घालण्यासाठी लागणारं मनुष्यबळही वाचेल, असं सांगण्यात येतंय.
याआधी, राजनाथ सिंह यांनी जम्मूमधल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरही अशाच प्रकारच्या फेन्सिंगचं उद् घाटन केलं होतं. पाच - पाच किमीच्या दोन टप्प्यांत ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
===============================