मुंबई, 24 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव' संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं.
'सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे? असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सूरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र त्यांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर लगेच जामीन दिला होता.
राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार तसंच गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत हे वक्तव्य केलं होतं.
फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी आढळल्याने राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय संसदीय समितीने घेतला आहे.
राहुल गांधी यांच्यावर झालेल्या या कारवाईवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधीवर झालेली कारवाई चुकीची असल्याचं म्हणत केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली.
लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi, Uddhav Thackeray