नवी दिल्ली, 8 मार्च : राफेल विमानांची कागदपत्रं चोरीला गेली, असं वक्तव्य अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी केलं होतं. त्यानंतर एकच गदारोळ झाला पण आता मात्र त्यांनी राफेलबद्दल वेगळाच दावा केला आहे. ही कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेलीच नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
राफेल प्रकरणी याचिकाकर्त्यांनी मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपीज वापरल्या आणि त्यामुळे कार्यालयीन गुप्ततेचा भंग झाला, असं मी सुप्रीम कोर्टाला सांगितलं, असा दावा वेणूगोपाल यांनी केला आहे.
राफेलची कागदपत्रं चोरीला गेली हे विरोधकांचं म्हणणं म्हणूनच पूर्णपणे चुकीचं आहे, असं त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी राफेल प्रकरणी याचिका दाखल केली आहे.
‘हिंदू’ या वृत्तपत्राने राफेल डीलबद्दलची कागदपत्रं चोरीला गेल्याबद्दलचे लेख छापले होते. त्यानंतर सरकारने या वृत्तपत्रालाही अशा बातम्या न छापण्याबद्दल नोटीस बजावली आहे.
राफेलची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून गहाळ झालीच कशी, असा सवाल करत काँग्रेसने सरकारवर टिकेची झोड उठवली होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरून मोदींवर हल्ला चढवला. ‘गायब हो गया’ अशी मोदींची नवी घोषणा आहे, असंही ते म्हणाले होते.
राफेलबद्दल अॅटर्नी जनरल वेणूगोपाल यांच्या या नव्या वक्तव्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली आहे. राफेल विमानांच्या कागदपत्रांबद्दल नेमकं काय झालं याबदद्ल खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे विरोधक पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवणार, अशी शक्यता आहे.
====================================================================================
गावावर आले बर्फाचे वादळ, थरारक VIDEO व्हायरल