लखनऊ, 13 जून : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशमध्ये तर गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीमधून स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला. काँग्रेससाठी हा देखील एका मोठा धक्का होता. या साऱ्या घडामोडीनंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली. शिवाय, पराभवाचं खापर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर देखील फोडलं. कार्यकर्त्यांनी एकत्र येत, मतभेद बाजुला ठेवून काम न केल्यानं काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे पराभवाबाबत झालेल्या समीक्षा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पराभव झटकून टाकत कामाला लागा असं आवाहन देखील कार्यकर्त्यांना केलं. शिवाय, उत्तर प्रदेशमध्ये 2022मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देखील यावेळी प्रियांका गांधी यांनी दिले.
'सोनियांच्या मागे जनादेश'
दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कार्यकर्त्यांमुळे नाही तर जनतेनं विजयी केलं असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. निवडणुका या संघटनेच्या एकीवर लढल्या जात असतात. त्यामुळे एकजुट होऊन काम करा असं आवाहन यावेळी प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांना केलं.
2022ची निवडणूक स्वबळावर
2022मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. भाजप विरोधात सपा – बसपानं देखील आघाडी केली होती. पण, या आघाडीला देखील उत्तर प्रदेशच्या जनतेनं नाकारलं. त्यामुळे आघाडीचं गणित पाहता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आहे. त्याबाबतची रणनीती आखायला काँग्रेसनं आता सुरूवात केली आहे.
SPECIAL REPORT: मालकाविना डेअरीमध्ये दूध पोहोचवणारा बैल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Priyanka gandhi