अयोध्या, २९ मार्च : काँग्रेसने आदेश दिला तर मी वाराणसीतून नरेंद्र मोदींविरुद्ध लढायला तयार आहे, असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. प्रियांका गांधींनी अयोध्येत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानमध्ये बिर्याणी खायला कोण गेलं होतं, असा सवालही त्यांनी विचारला.
प्रियांका गांधींनी सक्रिय राजकारणात एन्ट्री घेतल्यापासून त्या निवडणूक लढवणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्ते त्यांनी निवडणूक लढावी म्हणून त्यांना आग्रह करतायत.रायबरेलीमध्ये अशाच एका चर्चेच्या वेळी कार्यकर्ते त्यांना निवडणूक लढवण्याची गळ घालत होते. त्यावेळी, निवडणूक लढवायचीच असेल तर ती वाराणसीमधून का नको ? असा सवाल प्रियांका गांधींनी विचारला आणि लगेचच तर्क-वितर्कांना उधाण आलं.
उत्तर प्रदेशात वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवतायत. म्हणूनच वाराणसीमध्ये मोदी विरुद्ध प्रियांका गांधी अशी लढत असणार का, असाही प्रश्न विचारला गेला. सोशल मीडियावर या चर्चेला आणखीनच वेग आला.
वाराणसीमधून नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेस आणि सपा- बसपा आघाडीने अजून उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळेच प्रियांका काँग्रेसतर्फे इथून मोदींना आव्हान देणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असा सामना रंगला होता. यात काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचं नाव एवढं पुढे आलं नव्हतं. पण या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं होतं.
आणखी उमेदवार कोण ?
आता यावेळी मोदींच्या विरोधात कोण याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.प्रियांका गांधी यावेळी काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत. त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. सपा-बसपाची आघाडी आणि सत्ताधारी भाजप यांच्याशी त्या कसा सामना करतात ते पाहावं लागेल.
============================================================================================================================================================
प्रियांका गांधींचा थेट अयोध्येतून मोदींवर हल्लाबोल; काय म्हणाल्या पाहा VIDEO