नवी दिल्ली 4 जुलै: आत्मनिर्भर भारताचा नारा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेत त्यांनी देशातल्या तरुणाईला एक चॅलेंज दिलं असून जागतिक दर्जाचे Made In India App बनविण्याचं आवाहन केलं आहे. (Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge ) सध्याचं युग डिजिटलचं असून एका क्लिकवर सगळी कामं आणि व्यवहार होत आहेत. कोरोनामुळे त्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. त्यामुळे विदेशी तंत्रज्ञानावर विसंबून न राहता स्वदेशाला उत्तेजन देण्यासाठी पंतप्रधानांनी हे चॅलेंज दिलं आहे.
या चॅलेंजमध्ये पहिला क्रमांक मिळविणाऱ्याला 20 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 15 लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 10 लाखांचं बक्षीस असून इतर अनेक बक्षिसही देण्यात येणार आहे. 18 जुलैपर्यंत प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख आहे.
तरुणांमध्ये नव्या गोष्टी करण्याची प्रचंड ऊर्जा आणि स्टार्टअपच्या माध्यमातून ते अनेक नव्या गोष्टी करण्यासाठी धडपडत असतात. अशा ऊर्जावान तरुणांसाठी हे आव्हान असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. तुमच्याकडे ज्या नव्या कल्पना आहे. त्याचा वापर करून इनोव्हेशनच्या माध्यमातून असे Apps तयार होऊ शकतात. त्यासाठी हे चॅलेंज असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी
LinkedInवर लेखही लिहिला आहे. त्यात त्यांनी या स्पर्धेची विस्तृत माहिती दिली आहे. त्या माध्यमातून यात तरुणांना सहभागी होता येणार आहे.
सरकारने नुकतेच 59 चिनी Appsवर बंदी घातली होती. या Appsमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा दावा सरकारने केला होता. भारताने सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात जगभरात आपलं नावं केलंय. मात्र भारताचे स्वत:चे प्रॉडक्ट्स जागतिक पातळीवर फारच कमी आहेत. संशोधनात आणि गुंतवणुकीत आपण कमी पडत असल्याची तक्रार केली जाते.
आता या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकारने तरुणांना प्रोत्साहन दिलं असून चांगल्या सूचना आणि कल्पनांना सरकारही पाठबळ देणार आहे. आत्मनिर्भर भारत योजनेत हा मोठा उपक्रम समजला जातो.
संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.