नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : ज्येष्ठ वकील आणि कार्यकर्ते प्रशांत भूषण (Prashant bhushan contemp of court case) यांच्यावर न्यायालयाचा अवमान प्रकरणी (Contempt of court) सुरू असलेल्या खटल्यात त्यांनी कोर्टाची (Supreme court) माफी मागण्यास नकार दिला आणि आता त्यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. प्रशांत भूषण (Prashant bhushan) यांना फक्त समज देवून सोडून देण्यात यावं, असं अॅटर्नी जनरल (AG Venugopal) यांनी सांगितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, त्यांंचं स्पष्टीकरण वाचणं अत्यंत खेदकारक आहे.
प्रशांत भूषण यांनी कोर्टाच्या कारभारावर Twitter च्या माध्यमातून ताशेरे ओढले. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान झाल्याचा खटला दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने भूषण यांना केलेल्या टिप्पणीबद्दल माफी मागायचा आदेश दिला. पण माफी मागण्यास प्रशांत भूषण यांनी नकार दिला. माझ्या मतांचा आणि सदसदविवेकबुद्धीचा तो अवमान होईल, असं भूषण म्हणाले. अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी ही सुनावणी ऐकल्यानंतर भूषण यांना शिक्षा देऊ नये. केवळ समज देऊन सोडून देण्यात यावं, अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली आहे.
प्रशांत भूषण ज्येष्ठ वकील आहेत आणि सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांनी अनेकदा लोकांच्या भल्यासाठी जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्यांचं काम लक्षात घेऊन कोर्टाने त्यांना माफ करावं आणि शिक्षा देण्याऐवजी पुन्हा अशी अवमानकारक टिप्पणी न करण्याबाबत समज द्यावी, असं अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी सांगितलं.
त्यावर पुन्हा एकदा थोड्या विश्रांतीनंतर सुप्रीम कोर्टात सुनावणीचं काम सुरू झालं आहे. प्रशांत भूषण यांनी केलेली टिप्पणी आणि त्यावरचं स्पष्टीकरण वाचणं अत्यंत क्लेशकारक आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटल्याचं समजतं.