वाराणसी 30 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज आपल्या वाराणसी या मतदार संघात होते. देव दिवाळीचं निमित्त साधून वाराणसीत भव्य रोषणाई करण्यात आली होती. गंगेचा घाट नयनरम्य रोषणाईने उजळून निघाला होता. यावेळी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी काँग्रेसचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान म्हणाले, आमच्यासाठी वारसा म्हणजे या देशाची संपन्न संस्कृती आहे, इतिहास आहे, तर काही लोकांसाठी आपलं कुटुंब आणि परिवार हाच फक्त वारसा आहे. आस्था, विश्वास आणि संस्कृतीची मुल्य हाच खरा वारसा असल्याचंही ते म्हणाले.
शंभर वर्षांपूर्वी वाराणसीतून चोरीला गेलेली माता अन्नपूर्णेची मूर्ती पुन्हा परत येणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. वाराणशीच्या घाटावर दिपोत्सवर साजरा करण्यात आला. वाईटांवर चांगल्याचा हा विजय असल्याचं पंतप्रधान म्हणाले. यावेळी अत्याधुनिक अशा लेझर शोचंही आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधानांनी बोटीतून भ्रमण करत त्याचं अवलोकनही केलं.
देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचाही देश समर्थपणे मुकाबला करत आहे. त्याचबरोबर गरिबी सारख्या शत्रूशीही सरकारचा संघर्ष सुरू असल्याचं ते म्हणाले. सरकारने आत्मनिर्भर अभियानाच्या घोषणेचीही आठवण त्यांनी करून दिली. लोकल वस्तूंची खरेदी करा, त्यासाठी पुढाकार घ्या असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं.
Dev Deepavali in Kashi. Watch. https://t.co/Zc9FnBk8RT
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2020
या कार्यक्रमाला येण्याआधी पंतप्रधानांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या कामाचीही पाहणी केली. विश्वनाथाचं मंदिर असलेल्या परिसराचा कायापालट करण्याची ही योजना आहे.
Har Har Mahadev! pic.twitter.com/k2XD2Q74xl
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2020
राम मंदिराचं काम रखडविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच राम मंदिराचं काम मार्गी लागलं असंही पंतप्रधान म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi