26 मार्च : गेल्या तीन दिवसांपासून अण्णा हजारे दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे अण्णांचे वजन घटले असून, रक्तदाबही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु तरीही अण्णांच्या उपोषणाची भाजपा सरकारनं गांभीर्यानं दखल घेतलेली नाही.
दरम्यान काल अण्णांनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सरकार वचनं पाळत नसून जनतेला फक्त आश्वासनं देतं, चार वर्षांत भ्रष्टाचारमुक्त भारत बनवण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. अशी टीका अण्णांनी केली आहे.
आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अण्णांशी चर्चा करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिल्लीत दाखल झाले आहेत. गिरीश महाजन सरकारचे प्रतिनिधी म्हणून अण्णा हजारेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नसल्याचं अण्णांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उपोषणाचा पुढचा टप्पा काय असेल, भाजप सरकार अण्णांच्या मागण्यांची दखल घेणार का ? याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागंल आहे.